
नांदेड – लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांसह प्रशासकीय पातळीवरील तयारीलाही वेग आला आहे. लोकसभा निवडणुका शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या मदतीला निमलष्करी दलाच्या तुकड्याही राहणार आहेत. या तुकड्या नांदेडमध्ये दाखल झाल्या आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
नांदेड आणि हिंगोली लोकसभेसाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे तर लातूर मतदार संघासाठी ७ मे रोजी मतदान होईल. लोकसभा निवडणुकीतील प्रचार, मतदान आणि मतमोजणी शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. प्रचार, मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्ह्यात ३३० पोलीस अधिकारी आणि ३३० क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस दलाकडून प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत. संशयीतांवर नजर ठेवली जात असून रेकॉर्डवरील गुन्हेगारांना स्थानबद्ध करणे, नोटीस बजावणे आदी कायदेशीर बाबी पार पाडल्या जात आहेत.
२६ एप्रिल रोजी आणि ७ मे रोजी जिल्ह्यात होणाऱ्या मतदान प्रक्रियेनंतर ईव्हीएम मशीनची सुरक्षा महत्त्वपूर्ण आहे जिल्ह्यात असलेल्या ९ विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालय असलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये या मशीन पहिल्या टप्प्यात आणल्या जातील. त्यानंतर नांदेड लोकसभेच्या ईव्हीएम नांदेड येथे तर हिंगोलीच्या हिंगोली आणि लातूर लोकसभेच्या लातूर येथे ईव्हीएम मशीन मुख्यालय ठेवण्यात येणार आहेत. या मुख्य स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेचीही आखणी केली जात आहे. सीसीटीव्ही, केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचाही सुरक्षा कामासाठी वापर यासाठी केला जाणार आहे.
लोकसभा निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्ह्यात वर्ग एकचे ४०० अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्याचवेळी २५ हजार अधिकारी, कर्मचारी ही निवडणूक कामासाठी घेण्यात आले आहेत. या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे तीन टप्प्यात प्रशिक्षण होणार आहे. २८ मार्चपासून प्रशिक्षण सुरू होणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोणतीही सबब सांगून निवडणूक कामातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न न करता निवडणुका या लोकशाहीतील उत्सवात सहभागी व्हावे. राष्ट्रीय कामासाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.