
नांदेड : दिव्यांगांचे आधारस्तंभ माजी मंत्री बच्चू कडू यांचा पराभव मान्य नसल्याचे म्हणत एक प्रकारे ईव्हीएम मशीनमध्येच घोळ झाल्याचा आरोप करत त्याठिकाणी बॅलेट पेपरवर फेर मतदान करण्यात यावे किंवा बच्चू कडू यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात यावे. नांदेड जिल्ह्यासह राज्यात एकही आमदार नाही जो विधानसभेत दिव्यांगांच्या न्याय, हक्क मागण्यासाठी आवाज उचलू शकेल त्यांना न्याय हक्क मिळवून देऊ शकेल. त्यामुळे बच्चू कडू यांचे राजकीय पुनर्वसन झालेच पाहिजे म्हणून ‘आम्ही सारे बच्चू कडू’ चा नारा देत दिव्यांगांच्या प्रलंबित विविध मागण्यांसंदर्भात जागतिक अपंग दिनी ३ डिसेंबर रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी याबाबत माहिती दिली. ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनी नांदेडमध्ये दिव्यांगांचा आक्रोश मोर्चा व तीव्र स्वरूपाचे विद्रोही आंदोलन करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. राज्याच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या आहेत तर नांदेड जिल्ह्यात नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूका झाल्या आहेत. महायुतीच्या जागा नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आल्या आहेत. ईव्हीएम मशीनमध्येच काहीतरी गडबड करून आल्या असल्याचा आरोपही मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. किंबहुना ही शंका वर्तवली जात आहे. कारण महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांनासुद्धा यावेळी पराभूत व्हावे लागले. दिव्यांगांचे आधारस्तंभ माजी मंत्री बच्चू कडू यांचा पराभव मान्य नसल्याचे म्हणत एकप्रकारे ईव्हीएम मशीनमध्येच घोळ झाला असल्याचा आरोप केला. त्याठिकाणी बॅलेट पेपरवर फेरमतदान करण्यात यावे, बच्चू कडू यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात यावे. नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील असा एकही आमदार नाही जो विधानसभेत दिव्यांगांच्या न्याय, हक्क मागण्यासाठी आवाज उचलू शकेल त्यांना न्याय हक्क मिळवून देऊ शकेल त्यामुळे बच्चू कडू यांचे राजकीय पुनर्वसन झालेच पाहिजे म्हणून ‘आम्ही सारे बच्चू कडू’ ही मागणी तसेच दिव्यांगांच्या प्रलंबित विविध मागण्यांसंदर्भात ज्यामध्ये, दिव्यांग व्यक्तीसाठींचे अधिनियम RPWD ACT २०१६ व महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग धोरण २०१८ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, दिव्यांगांच्या हक्काचा दरवर्षीचा ३० लक्ष रूपये आमदार, खासदार निधी दरवर्षी खर्च करण्यात यावे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांगांचे मानधन ५ हजार रुपये करण्यात यावे, अंत्योदय राशन कार्ड, हक्काचे घरकूल, स्वयंरोजगारासाठी जागा, गाळे, शासकीय निमशासकीय अनुशेष भरणे, मुकबधीर कर्णबधिर दिव्यांगांसाठी स्वतंत्र चिन्हांकित वाहन व वाहन परवाना वितरीत करणे, अपंग दिव्यांग वित्त व विकास महामंडळाकडून ५० टक्के सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून द्यावे, मयत दिव्यांगांच्या परिवाराचे पुनर्वसन करावे या व इतर विविध मागण्यांसंदर्भात ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनी नांदेडमध्ये आक्रोश मोर्चा काढणार असल्याचे म्हटले आहे. हा आक्रोश मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा रेल्वेस्टेशन येथून जिल्हा परिषद, महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियोजन कार्यालयांसह संबंधित सर्वच शासकीय कार्यालयात धडकणार आहे. यावेळी एकापेक्षा अनेक प्रकारचे विविध तीव्र स्वरूपाचे विद्रोही आंदोलन करण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील शेकडो दिव्यांगांनी या आक्रोश मोर्चा व आंदोलनात सहभागी व्हावे असे, आवाहन दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष चंपतराव पाटील डाकोरे कुंचेलीकरसह दिव्यांग आघाडी मुखेड देविदास बद्देवाड, आदित्य पाटील आणि सर्व मूकबधीर, कर्णबधीर, ब्लाइंड संघटनेसह सकल बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.