
नांदेड – मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या नांदेड येथील निवडणूक सदिच्छा दूत डॉ. सान्वी जेठवाणी या लोकसभा निवडणुकीत थेट भाजपाच्या प्रचार मंचावर उपस्थित राहत असल्याचा प्रकार २३ एप्रिल रोजी नांदेडमध्ये पुढे आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक ज्यामध्ये महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायत आणि ग्रामीण भागातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती यांच्या निवडणुका घेण्याचे काम राज्य निवडणूक आयोगाकडून होते. मतदान जनजागृती, निवडणूक आयोगाची भूमिका सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली आहे. या निवडणूक सदिच्छा दुताकडून मतदान जनजागृती करणे अपेक्षित आहे. समाजातील वेगवेगळ्या घटकांना लोकशाहीचे महत्त्व पटवून देणे, लोकशाहीतील निवडणुकांची भूमिका, मतदान अधिकार याबाबत समाजातील वेगवेगळ्या घटकांमध्ये जनजागृती करण्याची जबाबदारी या निवडणूक सदिच्छा दूतावर असते.
महाराष्ट्र निवडणूक आयोगाने सदिच्छा दूत म्हणून नियुक्त केलेल्या नांदेडच्या डॉ. सान्वी जेठवाणी यांनी मात्र लोकसभा निवडणुकीत थेट भाजपच्या प्रचार मंचावर स्थान मिळवले आहे. त्यामुळे त्या महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या सदिच्छा दूत आहेत की भाजपाच्या दूत आहेत असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
विशेष म्हणजे नांदेड लोकसभा मतदार संघाचा प्रचार शेवटच्या टप्प्यावर म्हणजे एक दिवसावर आला असताना हा प्रकार घडला आहे. भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ या नांदेडमध्ये भाजपाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा प्रचार करण्यासाठी आल्या होत्या. नांदेड शहरात विष्णूनगर येथे चित्रा वाघ यांची सभा २३ एप्रिल रोजी सकाळी झाली. या सभेच्या मंचावरच महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या सदिच्छा दूत म्हणून कार्यरत डॉ. सान्वी जेठवाणी यांनी स्थान मिळवले. यावेळी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता देवरे चिखलीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. भाजपा, शिवसेना या राजकीय नेत्यांच्या समवेत डॉ. जेठवाणी या प्रचार मंचावर विराजमान होत्या.
सदर प्रकार राज्य निवडणूक आयोगाला कळविण्यात येईल- जिल्हाधिकारी राऊत. याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना विचारणा केली असता सदर प्रकाराबाबत राज्य निवडणूक आयोगाला कळविण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. तर तर महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या सदिच्छा दूत डॉ. सान्वी जेठवानी यांनी माझ्या एका वैयक्तिक कामासाठी तिथे मी गेले होते. त्यावेळी मला तिथे बसायला सांगितले. मी तिथे प्रचार केला नाही असे सांगितले.