अनुराग पोवळे
नांदेड – दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेडच्या गोदावरी नदीत ऐन वसुंधरा दिनीच हजारो मासे मृतावस्थेत आढळले आहेत. त्यामुळे गोदावरी नदी प्रदूषणाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दीडशे कोटीहून अधिक रक्कम गोदावरी नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी खर्च केल्यानंतरही गोदावरी मैलीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाढते प्रदूषण, जैवविविधतेचे नुकसान तसेच पर्यावरणीय समस्यावर प्रकाश टाकण्यासाठी जागतिक वसुंधरा दिन २२ एप्रिल रोजी साजरा केला जातो. १९७० पासून हा दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी प्रदूषण नियंत्रणावर केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची चर्चा केली जाते. मात्र ही चर्चा, उपायोजना नांदेडमध्ये तरी कागदावरच दिसत आहेत. गोदावरीच्या प्रदूषण मुक्तीसाठीपुढे येणाऱ्या काही संघटनाही काही दिवस स्वच्छतेचे फोटोशूट करतात आणि पुन्हा गायब होतात.
नांदेड येथे गोदावरी नदीत बंदाघाट परिसरात २०२० नंतर पुन्हा एकदा हजारो मासे मृतावस्थेत आढळले आहेत. एका जागरूक नांदेडकराने समाज माध्यमातून हा विषय प्रशासनापुढे आणला आहे. २०२० मध्ये गोदावरी नदीतील मासे कशामुळे मृत्युमुखी पडले होते, हे अद्याप स्पष्ट झाले नसतानाच पुन्हा एकदा मासे मृतावस्थेत आढळले आहेत.
गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या १३ कोटीच्या निधीतून १९९९ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून कामाला प्रारंभ झाला होता. नांदेड शहरातील १८ नाले गोदावरी नदीत मिसळतात. हे नाले मिसळू नये यासाठी ही योजना हाती घेण्यात आली होती. बोंढार येथे ११० एकर जागेवर मल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला. नाल्यांचे पाणी देगलूर नाका येथील पंपगृहात आणून ते बोंढार येथील केंद्रात पोहोचविणे अपेक्षित होते. २००८ मध्ये ही योजना पूर्ण झाली होती. २००८ ते २०१७ पर्यंत या योजनेकडे कोणीही पाहिले नव्हते. त्यानंतर २०१७ मध्ये ५५ लाख रुपये खर्चून बंद पडलेली योजना कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प केवळ सहा महिने चालला.
२०१९ मध्ये नांदेड महापालिकेने गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ७७ कोटींचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यातून चुनाल नाला येथे एक स्वतंत्र एसटीपी करण्यात आले आहे. मात्र आजघडीलाही गोदावरी नदीत मिसळणारे नाले थांबले नाहीत. ते थेट शहरातून निघून गोदावरी नदीतच मिसळत आहेत. केंद्र शासनाने नुकताच आणखी निधी याच कामासाठी दिला आहे. त्यामुळे आता तरी गोदावरी नदीत मिसळणारे नाले थांबतील का हा प्रश्न पुढे येत आहे. गोदावरी नदीतील जैवविविधतेला जीवनदान मिळेल का हा प्रश्न वसुंधरा दिनी नांदेडमधील पर्यावरण प्रेमी उपस्थित करत आहेत.