राजकीय

नांदेडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खिंडार

चिखलीकरांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख माधव पावडेसह भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर यांचाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

नांदेड : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माधव पावडे यांना उमेदवारी डावलण्यात आल्याने नाराज असलेल्या माधव पावडेसह अनेक पदाधिकाऱ्यांनी आज सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत पार पडला. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर, माजी आमदार अविनाश घाटे हेही राष्ट्रवादीत गेले आहेत. त्यामुळे आ. चिखलीकरांचे समर्थक आता हळूहळू एकवटत असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापर्यंत हे प्रवेश सोहळे सुरूच राहतील असेच राजकीय चित्र जिल्ह्यात दिसत आहे. याचा मोठा फटका आता भाजपाला बसतो की काँग्रेसला हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात स्वकर्तृत्वावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारे आक्रमक शिवसैनिक तथा माजी जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र निष्ठावान शिवसैनिकांना डावलून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये उपऱ्यांना संधी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या माधव पावडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादीचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते माधव पावडेसह शिवसेनेचे जिल्हा संघटक नेताजीराव भोसले, महानगर प्रमुख पप्पू जाधव, तालुका प्रमुख गणेश शिंदे, युवा सेना जिल्हाप्रमुख बालाजी शिंदे, युवती सेना जिल्हाप्रमुख रोहिणी कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष पावडे, दर्यापूरचे सरपंच विलास सूर्यवंशी, युवा सेना शहर प्रमुख अभिजीत भालके, सभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे यांच्यासह अनेकांनी आज राष्ट्रवादी प्रवेश केला आहे.

विधानसभेची उमेदवारी नाकारलीच, जिल्हाप्रमुख पदावरूनही केले होते दूर…शिवसेनेत गेल्या अनेक वर्षापासून निष्ठेने काम करूनही या पक्षात उपऱ्यांना मोठ्या प्रमाणात संधी देत असल्याची ओरड होत असताना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने माधव पावडे यांना जाणीवपूर्वक उमेदवारी नाकारली तर अन्य पक्षातून आलेल्या उपऱ्यांना संधी देऊन निष्ठावानांची गोची केली. इतकेच नव्हे तर नव वर्षाच्या प्रारंभीच पावडे यांचे जिल्हा प्रमुख पदही काढून घेतले होते. त्यामुळे नाराज झालेल्या माधव पावडे यांनी अखेर आ. चिखलीकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. पावडे हे प्रारंभीपासूनच चिखलीकर यांच्या जवळचे मानले जात होते. चिखलीकरांचे मानसपुत्र म्हणूनही ते ओळखले जातात. त्यामुळे आगामी काळातील राजकीय वाटचाल त्यांच्याच नेतृत्वात करण्याचा निर्णय माधव पावडे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापूर्वी घेतला आहे हेही उल्लेखनीय आहे. असाच प्रकार भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर यांच्याबाबतीतही घडला आहे. त्यांनाही विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारली. तर पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पक्षातून निलंबित करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!