
नांदेड – एका राजकीय घटनेची तुलना थेट स्वातंत्र्य संग्रामाशी करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या वैचारिक दिवाळखोरीचे दर्शन घडविले असल्याची टीका माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण यांनी केली. नांदेडला १२ फेब्रुवारी २०२४ रोजी दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळाल्याची टिपणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी नांदेडमध्ये केली होती. त्या टीकेला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज सोमवारी उत्तर दिले. नाना पटोले यांचे राजकारण हे नेहमीच गटबाजी आणि संकुचित प्रवृत्तीचे असल्याचेही चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.
नांदेडमध्ये रविवारी भक्ती लॉन्स येथे नांदेड, परभणी आणि हिंगोली येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात अमित देशमुख, नसीम खान, खा. वसंतराव चव्हाण आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर नांदेड आणि मराठवाड्याला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळाले अशी टिपणी केली होती. त्या टिपणीला खा. चव्हाण यांनी उत्तर देताना एका राजकीय घटनेचा थेट स्वातंत्र्य संग्रामाशी संबंध जोडून त्या स्वातंत्र्यसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला आहे. या सर्व वक्तव्यातून नाना पटोले यांच्या वैचारिक दिवाळखोरीचे दर्शन घडल्याचे ते म्हणाले. नांदेडमध्ये झालेली काँग्रेसची आढावा बैठक ही संघटनात्मक बैठक होती की केवळ वैयक्तिक आकस, टीका करण्यासाठी होती असे तेही म्हणाले. काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला ही बाब न शोभणारी आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही काँग्रेसमधून भाजपा आणि भाजपातून पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांचा प्रवेशही काय साकोली मतदारसंघासाठी स्वातंत्र्य आणि पारतंत्र्यच होते काय असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला.
काँग्रेसमध्ये असताना आपण देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून दिला होता. नांदेड महापालिकेतही विक्रमी विजय मिळवला होता. तसेच नांदेड जिल्ह्यात नऊच्या नऊ जागा काँग्रेस आघाडीच्या जिंकून आणल्या होत्या. नाना पटोले यांनी असा कोणता विजय मिळवला, हे त्यांनी सांगावे असे चव्हाण यांनी म्हटले. देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात आपले नावही नव्हते. त्यामुळे सहकाऱ्यांचे कौतुक करण्याचा मोठेपणा नाना पटोलेकडे नाही. दिवस मावळतीला असताना प्रतिमा मोठी होते. मात्र ती पुन्हा केव्हा अदृश्य होईल हे सांगता येत नाही. अशीच परिस्थिती नाना पटोले यांनी होईल असेही चव्हाण यांनी सांगितले.
नांदेडमध्ये झालेल्या गुरु ता गद्दी सोहळ्यातील दोन हजार कोटींचा हिशोब नानांनी विचारला असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला असता, चव्हाण यांनी आता १६ वर्षानंतर नाना पटोले यांना आठवण कशी झाली असा सवाल केला. १६ वर्षानंतर प्रत्येक शहरातील रस्त्यांची अवस्था काही प्रमाणात बिकट झालेली आहे. तसाच प्रकार नांदेडमध्ये झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माजी मंत्री अमित देशमुख यांनी केलेल्या टिकेबाबत देशमुख हे वयाने लहान असून त्यांचा राजकारणातील अनुभव कमी आहे, त्यामुळे त्यांच्या टीकेला उत्तर मी देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
माजी मंत्री डी. पी. सावंत यांना नाना पटोले यांनी शारदा भवन शिक्षण संस्थेची सर्व पदे सोडून काँग्रेसमध्ये कार्य करण्याचा सल्ला दिला होता. यावर खा. चव्हाण यांनी शारदा भवन शिक्षण संस्था ही राजकीय व्यासपीठ नाही संकुचित राजकारण नानांनी करू नये. स्वतः नाना पटोले हे मुंबईमध्ये एमसीएच्या निवडणुकीत उभे होते. त्यावेळी त्यांना असे सुचले नाही. भाजपाचे आशिष शेलार हे अध्यक्ष आहेत. राजकारणात प्रत्येकाचे संबंध असतात. हे संबंध टिकवले पाहिजे ,असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतूक हंबर्डे आणि किशोर देशमुख यांची उपस्थिती होती.
नाना पटोले यांच्याकडून काँग्रेसमध्ये कायम गटबाजीला थारा… काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये कायम गटबाजीला थारा दिला आहे. प्रारंभीपासूनच हा या गटाचा, तो त्या गटाचा अशी त्यांची भूमिका राहिली आहे. यातून अनेकांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे. पटोले हे काँग्रेसमध्ये असतानाही आपल्याविरुद्ध बंद खोलीत बोलत होते. आता त्यांना चारचौघात बोलण्याची संधी मिळाली आहे. पटोले हे कायम आत्मस्तुतीत मग्न राहणारे नेते आहेत. लोकसभेला मिळालेले अनपेक्षित यश हे केवळ अपघाताने मिळालेले यश आहे. यामध्ये नाना पटोले यांचा कोणताही वाटा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फेक नॅरेटिव्ह तयार करून काँग्रेसने अनेक जागा मिळवल्याची टीका चव्हाण यांनी यावेळी केली.