
नांदेड – नांदेड जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी तसेच बाजारातून गहाळ झालेले तब्बल ३२ लाख ८९ हजार रुपयांचे २०५ मोबाईल नांदेड पोलिसांनी जप्त केले आहेत. सायबर सेल, स्थानिक गुन्हे शाखा आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे पथक तयार करून हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्या मोहिमेला चांगले यश लाभले असून २०५ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानुसार हाती घेतलेल्या या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हा शाखचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले. यामध्ये सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक एस. बी. चव्हाण, पोलीस जमादार सुरेश वाघमारे, राजेंद्र सिटीकर, दीपक ओढणे, दाविद पिडगे, मोहम्मद आसिफ, विलास राठोड, रेश्मा पठाण, काशिनाथ कारखेडे, किशोर जैस्वाल, मोहन स्वामी, दीपक शेवाळे, राज यन्नावार, व्यंकटेश सांगळे, दीपक राठोड आदींनी परिश्रम घेत या हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे पथकही या कारवाईत सहभागी होते. पोलिसांनी जप्त केलेल्या या २०५ मोबाईलपैकी काही मोबाईल पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते रविवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात संबंधित मोबाईल धारकांना परत करण्यात आले.
ज्या नागरिकांचे मोबाईल हरवले आहेत त्यांनी आपल्या मोबाईल ईएमआयइ क्रमांकाची माहिती नांदेड पोलीस दलाच्या ‘नांदेड पोलीस’ आणि फेसबुक पेज व ट्विटरवर टाकण्यात आली आहे. आपल्या हरवलेल्या मोबाईलचा ईएमआयइ क्रमांक सायबर सेलकडे देऊन मोबाईल घेऊन जाण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, नांदेड पोलिसांनी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली २०१४ मध्ये आतापर्यंत ६१४ मोबाईल शोधले आहेत. या मोबाईलची किंमत १ कोटी ९५ हजार रुपये इतकी आहे.