
नांदेड – इराण आणि अमेरिका – इस्रायल युद्ध सुरू झाल्यानंतर इराणने शेजारील आखाती देशावरही हल्ले चढवले आहेत. या परिस्थितीत भारतासह महाराष्ट्रातील अनेक कुटुंब या देशामध्ये वास्तव्यास आहेत. या परिस्थितीत आखाती देशातील अबुधाबी येथील लातूरचे प्रवीण चव्हाण आणि ज्योती चव्हाण या कुटुंबीयांशी ‘नांदेड स्क्रिप्ट’ने थेट संपर्क साधला असता त्यांनी अबुधाबी येथील परिस्थितीचे कथन केले. आजच्या युद्धजन्य परिस्थितीत संपूर्ण नागरिकांची काळजी घेण्यासाठी युएई प्रशासन २४ तास सतर्क असल्याची प्रतिक्रिया चव्हाण कुटुंबियांनी दिली. युद्ध लांबल्यास या कुटुंबीयांनी महाराष्ट्रात परत येण्याची इच्छा दर्शवली आहे; पण आजघडीला तेथे कोणताही धोका नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षापासून खाजगी नोकरीनिमित्त लातूर येथील प्रवीण चव्हाण आणि त्यांचे कुटुंबीय आखाती देशातील अबुधाबी येथे स्थायिक झाले आहेत. युद्धजन्य परिस्थितीत त्यांच्याशी नांदेड येथून महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रकाश कांबळे यांचे नातेवाईक असलेल्या चव्हाण कुटुंबीयांशी एकमतचे नांदेड आवृत्तीप्रमुख चारुदत्त चौधरी आणि ‘नांदेड स्क्रिप्ट’चे संपादक अनुराग पोवळे यांनी थेट संपर्क साधला. इराणकडून आखाती देशांवरील होत असलेले हल्ले पाहता असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. या परिस्थितीतही चव्हाण कुटुंबीयांनी मात्र अबुधाबी हे शहर आजघडीला तरी सर्वात सुरक्षित शहर असल्याचे सांगितले आहे. अबुधाबी येथील स्थानिक प्रशासनाने शाळा, कार्यालय ऑनलाईन पद्धतीने सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचवेळी नागरिकांनाही गरज असल्यास बाहेर पडावे, अशा सूचनाही दिल्या आहेत.
भारतीय दूतावासाकडूनही डॉ. मित्तल यांची सूचना दिल्या आहेत. त्या संदर्भातील व्हिडिओ अबुधाबी येथील नागरिकांना पाठविण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासनाकडून नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. तसेच व्हाट्सअप चॅनलद्वारेही आवश्यक माहिती दिल्या जात आहेत. चव्हाण कुटुंबीयांसह महाराष्ट्र तसेच भारतातील जवळपास ४० ते ५० कुटुंब अबुधाबी शहरात एकत्रपणे राहत आहेत. आतापर्यंत भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडून या कुटुंबीयांना अद्याप कोणत्याही पातळीवर स्तरावर संपर्क झालेला नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले. युद्धजन्य परिस्थितीत कार्यालय आणि शाळा ऑनलाईन पद्धतीने चालवल्या जात आहेत. गरज असल्यासच घराबाहेर पडावे, अशा सूचनाही स्थानिक प्रशासनाने दिले आहेत. सध्या शाळांना स्प्रिंग ब्रेक आहे. तो वाढविण्यात आले आहे. सध्या अबुधाबी येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. आजघडीला सर्व जीवनावश्यक आणि आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होत आहेत. विमानसेवा बंद असल्याने बाहेरील देशांशी संपर्क तुटला आहे.
महाराष्ट्र सरकारने आखाती देशात जीलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन सुरू केले आहे. पण त्याचवेळी जे तेथे कामानिमित्त स्थायिक झाले आहेत त्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. सध्या तरी या भागात पॅनिक होण्याची गरज नसल्याचे चव्हाण कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे. युएई सरकार स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षेबाबत सतर्क आहे. वेगवेगळ्या माध्यमातून सुरक्षेच्या अनुषंगाने सतर्कतेच्या सूचना दिल्या जात आहेत. वेगवेगळ्या हेल्पलाइनही सुरू करण्यात आल्या आहेत.
भारतात येण्याची ओढ आहेच..! कामानिमित्त अबुधाबी येथे यावे लागले आहे. पहिल्यांदा लातूर सोडल्यानंतर पुणे येथे आणि पुढे अबुधाबी येथे स्थायिक झालो असलो तरीही भारताची मायदेशाची ओढ कायमच आहे. आज युद्ध सुरू झाल्याने येथील परिस्थिती नियंत्रणात असली तरीही लातूर, महाराष्ट्र तसेच भारत भूमीकडे परतण्याची ओढ निश्चितच लागली आहे. आज आखाती देशातील विमानसेवा बंद आहेत. ही विमानसेवा लवकरच सुरू होईल; पण युद्ध लांबल्यास आम्हालाही मायदेशी परतण्यासाठी सरकारने तातडीने व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे प्रवीण चव्हाण आणि ज्योती चव्हाण या दांपत्याने ‘नांदेड स्क्रिप्ट’ शी बोलताना सांगितले.



