क्राईम

नांदेड पोलीस परिक्षेत्रात अवैध धंद्यांवर पुन्हा एकदा ‘मास रेड’

नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात एकाच दिवशी १६९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल, ९ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड – नांदेड पोलीस परीक्षेतील अवैध धंद्याविरुद्ध पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी उगारलेला कारवाईचा बडगा सुरूच असून नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली या चारही जिल्ह्यात २१ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी ‘मास रेड’ करून तब्बल १६९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवायांमध्ये ९ लाख ८१ हजार २०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वाधिक मुद्देमाल हिंगोली जिल्ह्यात जप्त केल्याची बाबही पुढे आली आहे.

पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड पोलीस परिक्षेत्राचा कार्यभार स्वीकारल्यानंतर परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली या चारही जिल्ह्यात स्वतंत्र बैठका घेऊन सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना अवैध व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी ठराविक मुदतही देण्यात आली होते. नांदेडसह परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यात अवैध धंद्यावर कारवाईसाठी पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकांची स्थापनाही करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात या पथकाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. त्यामुळे अवैध धंद्याला मोठ्या प्रमाणावर आळा बसला असल्याचेच स्पष्ट होत आहे.

नांदेड पोलीस परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यात २१ सप्टेंबर रोजी अवैध दारू गाळप आणि विक्री करणाऱ्यांवर धाडी टाकून दारू व्यवसायाच्या उच्चाटनासाठी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान अवैध दारू गाळप आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध नांदेड परिक्षेत्रात १६६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ९ लाख ८१ हजार २०५ रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. त्याचवेळी १६९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये हातभट्टी दारू, दारूचे रसायन, देशी दारू, विदेशी दारू आदी बाबींचा समावेश आहे. २१ सप्टेंबरच्या या मोहिमेत पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अप्पर पोलीस अधीक्षक, सर्व पोलीस उपाधीक्षक, संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, अंमलदार यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेचे अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले होते.

नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती त्या त्या ठाण्याला द्यावी आणि या मोहिमेस हातभार लावावा असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

सर्वाधिक ५८ गुन्हे परभणी जिल्ह्यात…पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार २१ सप्टेंबर रोजी राबवलेल्या ‘मास रेड’मध्ये सर्वाधिक गुन्हे परभणी जिल्ह्यात नोंदवण्यात आले आहेत. या जिल्ह्यात ५८ गुन्हे दाखल करण्यात आले असून ५८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. १ लाख ८० हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्वाधिक मुद्देमाल हा हिंगोली जिल्ह्यात जप्त करण्यात आला आहे. येथे ५ लाख ३६ हजार ८४० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २४ गुन्हे दाखल करताना २६ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यात ५० गुन्हे दाखल करण्यात आले असून ५० जणांवर कारवाई केली आहे. १ लाख ८४ हजार ८८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नांदेड जिल्ह्यात ३४ कारवायांमध्ये ३५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. नांदेड जिल्ह्यात ७९ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या मास रेडमध्ये १६२ अधिकारी आणि ५९७ अंमलदार सहभागी झाले होते. २१ सप्टेंबरच्या या मास रेड सोबतच यापूर्वी परिक्षेत्रात ३ ऑगस्ट, १० ऑगस्ट आणि २५ ऑगस्ट रोजी ‘मास रेड’ अंतर्गत कारवाया करण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!