नांदेड – नांदेडच्या राजकारणातील एक संघर्षमय नेतृत्व आणि २०१९ मध्ये जायंट किलर ठरलेले नेते माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना अखेर भाजपातून बाहेर काढण्यात नांदेड भाजपातील एका मोठ्या गटाला यश आले आहे. माजी खासदार चिखलीकर यांनी आज शुक्रवारी सकाळी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा मुंबईत पार पडला. प्रवेशानंतर चिखलीकर यांना लोहा विधानसभा मतदारसंघाच उमेदवारीही पक्षाने घोषित केली आहे. या प्रवेशाने पुन्हा एकदा नांदेडच्या राजकारणाला कलाटणी मिळणार आहे. ते महायुतीच्या एका घटक पक्षात गेले असले तरीही जिल्ह्यात मात्र त्यांची स्वतंत्र राजकीय भूमिका राहणार की नाही याकडेही आता लक्ष लागले आहे.
भाजपातील पक्षांतर्गत विरोधकांकडून लोकसभेच्या एप्रिल २०२४ च्या निवडणुकीतच चिखलीकर यांची घेराबंदी करण्यात आली होती. तर आता विधानसभा निवडणुकीत त्यांची उमेदवारीसाठी कोंडी करण्यात आली. ती कोंडी फोडण्यात चिखलीकर यांना अखेरपर्यंत यश आलेच नाही. त्यामुळे अखेर चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली आहे. लोहा मतदार संघात विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असताना भाजपाची उमेदवारी मिळणार नाही, हे स्पष्ट होताच चिखलीकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. चिखलीकर यांनी यापूर्वीही राष्ट्रवादीत काम केले आहे. भाजपात असताना त्यांना वेळोवेळी पक्ष बदलासंदर्भात विचारले असता आपण कुठेही गेलो तर ती आपली घरवापसी ठरेल, असे ते सांगायचे. आता पुन्हा एकदा त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला आहे. जिल्ह्यात नावालाच असलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीला चिखलीकर यांच्या प्रवेशामुळे नवे बळ मिळणार आहे.
विधानसभा निवडणुकीत दोन महिन्यांपासून तयारीला लागलेल्या चिखलीकर यांची भाजपाने उमेदवारीसाठी अक्षरशः भाजपाने ससेहोलपट केली. तर दुसरीकडे भाजपावासी झालेल्या माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कन्या ॲड. श्रीजया चव्हाण यांना भाजपाने पहिल्याच यादीत उमेदवारी घोषित केली. तर चिखलीकर यांना लोहा मतदार संघात उमेदवारीसाठी प्रतीक्षेत ठेवले. दुसरीकडे चिखलीकर यांनी नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आपली कन्या प्रणिता चिखलीकर- देवरे यांच्यासाठी उमेदवारी द्यावी असा प्रस्ताव भाजपापुढे ठेवला होता. मात्र हा प्रस्तावही भाजपाने धुडकावला. गुरुवारी दिल्लीत झालेल्या भाजपाच्या पार्लमेंट्री बोर्डाच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनाही पाचारण केले होते. त्या बैठकीत चिखलीकर यांच्या सर्वच मागण्या धुडकावल्याचे स्पष्ट होताच चिखलीकर यांनी आपली नवी राजकीय वाट स्वीकारली. चिखलीकर यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी एप्रिल २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर नांदेडच्या भाजपाला मोठे बळ मिळेल, असा विश्वास देशपातळीपासून ते राज्यपातळीवरील नेत्यांना होता. जिल्हा पातळीवरही चिखलीकर आणि अशोकराव मिळून लोकसभेच्या निवडणुकीत विजयाचा इतिहास रचतील असा विश्वास जिल्ह्यातील भाजप प्रेमींना वाटू लागला. पण लोकसभेचा निकाल अनपेक्षितपणे भाजपाच्या विरोधात गेला. निवडणुकीच्या मध्यात अन् निकालानंतरही भाजपाचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांच्या पाठीत कोण कोण खंजीर खुपसला याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्या चर्चांनाही खुद्द चिखलीकर यांनी निकालानंतर आपल्याला मिळालेल्या समर्थनार्थ लोकसभा मतदारसंघातील आभार बैठकात चिखलीकर यांनी सभेत तोफ डागताना प्रत्येकाचा हिशेब होईल, असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले गेले. पुढे चिखलीकर यांनाच खुलासा करावा लागला होता. काही काळ चिखलीकर आणि अशोकराव चव्हाण यांनी आम्ही एकत्र असल्याचा दावा केला होता. पक्षांतर्गत वेगवेगळ्या पदावर नियुक्ती देतानाही चव्हाण आणि चिखलीकर यांच्यात एकमेकांना शह काटशह सुरूच होते.
एप्रिल २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत चिखलीकर यांचा पराभव का झाला, याची कारणमीमांसा करण्यासाठी राज्यस्तरावर समिती गठित झाली होती. नांदेडचे निरीक्षक म्हणून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नांदेड येथे स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून पराभवाची कारणे जाणून घेतली. यावेळी अनेक पदाधिकारी, नेते यांना चिखलीकर यांच्या पराभवास जबाबदार असल्याचे बैठकीतच कार्यकर्त्यांनी सांगितले होते. अनेक बैठकीत वादही झाले होते. मात्र पराभवास जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कोणतीही कारवाई झालीच नव्हती. विजयासाठी चांगली परिस्थिती असतानाही माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने संपूर्ण चित्रच बदलले होते. निकालानंतर त्याबाबतही वेगवेगळ्या चर्चा झाल्या. या सर्व घडामोडींवर चिखलीकर आता खुलेपणाने बोलतील, ते आपल्या लोकसभेतील पराभवाचा ठपका कोणाकोणावर फोडतात हे पाहणेही आता औत्सुक्याचे ठरणार आहे.