
नांदेड – नांदेडहून मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे गाडी सुरू करण्याची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी अखेर दक्षिण मध्य रेल्वेने पूर्ण केली आहे. या गाडीचा मार्ग अकोला, मनमाडमार्गे असल्याने या गाडीला किती प्रतिसाद मिळेल याबाबतही शंकाच आहे. सोमवारपासून नांदेडकरांना मुंबईसाठी ही स्वतंत्र रेल्वे मिळणार आहे मुंबईसह टनकपूर–नांदेड ही नवी गाडीही मिळणार आहे.
नांदेडची रेल्वे संपर्क सुविधा अधिक बळकट करण्यासाठी ६ जुलैपासून दोन नवीन एक्सप्रेस गाड्या सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये एक गाडी नांदेड–मुंबई आणि दुसरी टनकपूर–नांदेड दरम्यान धावणार आहे. या दोन्ही गाड्यांना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रवनीत सिंह, केंद्रीय राज्यमंत्री जितिन प्रसाद आणि केंद्रीय राज्यमंत्री अजय टम्टा हे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, खासदार श्री अशोकराव चव्हाण, विधान परिषद सदस्य व हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, नांदेडच्या महापौर कविता संतोष मुळे, खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार रवींद्र चव्हाण, विधान परिषद सदस्य विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. अमरनाथ राजूरकर, आ. बालाजी कल्याणकर, आ. आनंद तिडके हे हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर आयोजित स्थानिक कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रातील रेल्वे विकासाला अलीकडील काळात मोठी गती मिळाली आहे. पायाभूत सुविधा विकास, क्षमता वृद्धीची कामे आणि रेल्वे स्थानकांच्या व्यापक आधुनिकीकरणाची अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत. राज्यातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत केला जात असून, जनतेच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका आहे. याच दिशेने हजूर साहिब नांदेड येथून दोन नवीन एक्सप्रेस गाड्या सुरू करण्यात येत आहेत. यापैकी एक गाडी राज्याच्या राजधानी क्षेत्राशी तर दुसरी देवभूमी उत्तराखंडशी थेट रेल्वे संपर्क उपलब्ध करून देणार आहे.
नांदेड–मुंबई–नांदेड एक्सप्रेस आठवड्यातून दोन दिवस अकोला व मनमाड मार्गे धावेल. या गाडीत आरक्षित तसेच अनारक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध असेल. टनकपूर–नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस नांदेडहून रविवारी तर टनकपूरहून मंगळवारी धावेल. ही गाडी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या स्थानकांना देवभूमी उत्तराखंडशी थेट रेल्वे संपर्क उपलब्ध करून देईल. सुरक्षित, आरामदायी, किफायतशीर व सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. पर्यटन व तीर्थयात्रेला चालना मिळेल.व्यापार व वाणिज्याच्या संधींमध्ये वाढ होईल.देशाच्या पश्चिम व उत्तर भागांमधील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होईल. विद्यार्थी, व्यावसायिक, कुटुंबे, भाविक, पर्यटक आणि उद्योजक यांना अधिक आरामदायी व सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळेल. प्रदेशाच्या सामाजिक व आर्थिक विकासाला चालना मिळेल.



