
नांदेड – हर घर तिरंगा अभियानांतर्गत नांदेड मध्ये मंगळवारी स्वच्छता अभियानास प्रारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा गांधी पुतळ्याजवळ या अभियानास प्रारंभ करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांनीही या मोहिमेत सहभाग नोंदवला होता.
जिल्ह्यात हर घर तिरंगा अभियानांतर्गत २ ऑगस्टपासून १५ ऑगस्टपर्यंत वेगवेगळे अभियान उपक्रम राबविले जात आहेत. शेवटच्या टप्प्यात १२ ऑगस्ट रोजी आज स्वच्छता अभियानाला प्रारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते यांच्या हस्ते शहरातील महात्मा फुले पुतळ्याजवळ या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला जिल्हाधिकारी कर्डिले यांनी या मोहिमेत सहभागी होताना स्वतः महात्मा गांधी पुतळा तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महापालिका उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनीही या या मोहिमेत सहभागी होत हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालय उपविभागीय कार्यालय येथेही मंगळवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाणे ज्यामध्ये पुतळा परिसर, शासकीय कार्यालय, ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता केली जाणार आहे.
शहरात स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते महात्मा गांधी पुतळ्याजवळ प्रतिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. या मोहिमेत निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, नायब तहसीलदार मकरंद दिवाकर, महसूल विभागाचे विभाग प्रमुख, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त यांच्यासह विविध विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत स्वच्छता मोहिमेचा समावेश करण्यात आला आहे. या स्वच्छता मोहिमेला जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील भोकर, किनवट, हिमायतनगर या तालुका बस स्थानकात प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबवली. त्याचवेळी मुखेड तहसील कार्यालयानेही स्वच्छता मोहीम राबवत जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. सार्वजनिक वावर असलेल्या ठिकाणांची स्वच्छता व्हावी हा मूळ उद्देश जिल्हाधिकारी कर्डिले यांनी या अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये प्रामुख्याने समाविष्ट केला आहे.



