
नांदेड – नांदेड लोकसभेचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे २६ ऑगस्ट रोजी झालेल्या दुःखद निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संसद सचिवालयाला अहवाल पाठविला आहे. संसद सचिवालयाकडून याबाबत भारत निवडणूक आयोगाला माहिती दिली जाते. त्यानंतर निवडणूक आयोग या रिक्त झालेल्या जागेच्या पोटनिवडणुकीबाबत निर्णय घेते. ही निवडणूक राज्यातील आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसोबतच होईल का नाही याबाबत भारत निवडणूक आयोगच्या अंतिम निर्णय घेईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघात त्यांनी भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा ५९ हजार ४४२ मतांनी पराभव केला होता. या विजयानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड येथे ११ ऑगस्ट रोजी काँग्रेसची विभागीय आढावा बैठक पार पडली होती. त्यानंतर १३ ऑगस्ट रोजी त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. तातडीने खासदार वसंतराव चव्हाण यांना एअर ॲम्बुलन्सने हैदराबादला हलवण्यात आले होते. १३ ऑगस्टपासून त्यांच्यावर हैदराबादमध्ये उपचार सुरू होते. अखेर २६ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर उद्या २७ ऑगस्ट रोजी नायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
यानंतर काँग्रेसचे नेते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांच्यासह राज्यभरातील अनेक नेत्यांनी चव्हाण कुटुंबीयांचे नायगाव येथे जाऊन सांत्वन केले. दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर सर्व धार्मिक विधी पार पडल्यानंतर नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीने एकमुखाने लोकसभेच्या आगामी पोटनिवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांनाच द्यावी असा ठराव सोमवारी केला आहे. काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना १४ सप्टेंबर रोजी मुंबईत पाचारण केले आहे. या बैठकीत नांदेड लोकसभेच्या उमेदवारीबाबत काही चर्चा होईल, अशी शक्यता आहे. नांदेडची ही जागा पुन्हा एकदा आम्हीच जिंकू, असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांनी व्यक्त केला आहे.
ही निवडणूक घेण्याबाबत भारत निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणताही घोषणा झालेली नसताना भाजपासह सर्वच पक्षातील इच्छुक मात्र आतापासूनच तयारीला लागले आहेत. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात ४ लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. ही संधी साधत आगामी लोकसभा पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी पूरग्रस्तांच्या भेटीगाठीच्या माध्यमातून आपला प्रचार सुरू केला आहे. काँग्रेसने आपला उमेदवार जिल्हास्तरावर तरी निश्चित केला आहे. भाजपाकडून पुन्हा एकदा प्रतापराव पाटील चिखलीकर हे रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. तर दुसरीकडे भाजपातीलच त्यांचे इतर प्रतिस्पर्धी आपल्याला पोटनिवडणुकीचे तिकीट मिळावे यासाठी पक्षस्तरावर आपापल्या पद्धतीने फिल्डिंग लावत आहेत. चिखलीकरांना पुन्हा तिकीट मिळू नये अशी व्यूहरचना भाजपातील त्यांच्या विरोधकाकडून केली जात आहे. त्यामुळे चिखलीकर हे आपले पक्षातील वजन वापरून पुन्हा एकदा उमेदवारी मिळवतील का याकडे लक्ष लागले आहे.
लोकसभेची पोटनिवडणूक विधानसोबत होणार का..?महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे. सर्वच पक्षाकडून या निवडणुकीची तयारी केली जात आहे. विधानसभेसोबतच नांदेडच्या रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेसाठीही पोटनिवडणूक होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र प्रत्यक्षात ही निवडणूक विधानसभेसोबत होईल की नाही याबाबत सद्यस्थितीत तरी कोणतीही खात्री दिली जाऊ शकत नाही, अशीच परिस्थिती आहे. राज्यात पुणे, चंद्रपूर येथील लोकसभेच्या पोटनिवडणूक वेळेवर झाल्याच नव्हत्या किंबहुना त्या घेतल्याही नव्हत्या. त्यामुळे नांदेड लोकसभेचा पोटनिवडणुकीबाबतही सध्या तरी काहीही सांगितले जाऊ शकत नाही, असेच चित्र आहे.