
नांदेड – काँग्रेसचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांनी अखेर आपल्या जिल्हाध्यक्ष आणि काँग्रेस प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मागच्या आठवड्यातच कदम यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्याचवेळी भाजपा नेते, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा उद्या सोमवारी नांदेड दौरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कदम यांनी वेळ साधली, असाच संदेश जात आहे. काँग्रेसला नांदेड जिल्ह्यात खूप काम करावे लागणार आहे मात्र तसे होत नाही, असे सांगून कदम यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्षाकडे सुपूर्द केला आहे.
कदम यांनी आपला जिल्हाध्यक्ष आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा २२ मे रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सोपवला आहे. बी. आर. कदम यांनी काँग्रेसमध्ये जवळपास ४० वर्षे काम केले होते. मध्यंतरीच्या काळात ते राहुल गांधीच्याही ते नजीक गेले होते; मात्र काँग्रेसमध्ये असताना त्यांना ना जुन्या काळात संधी मिळाली ना आता. त्यामुळे बेचैन असलेल्या आणि काँग्रेस नेते शंकरराव चव्हाण कुटुंबीयांशी एकनिष्ठ असलेल्या कदम यांना अशोकराव चव्हाण हे भाजपात गेल्यानंतर त्यांच्याच नेतृत्वात आता काम करण्याची इच्छा असल्याचे स्पष्ट झाले आहे. कदम यांनी दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांच्यासोबत ३० वर्षे काम केले आहे तर विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांच्या सोबतही त्यांची दहा वर्षांची राजकीय कारकीर्द राहिली आहे. मध्यंतरीच्या काळात पाच, सहा वर्षे ते चव्हाण यांच्यापासून दुरावले होते; मात्र गेल्या आठवड्यात खासदार चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन चहापाणी घेतले आणि बी. आर. कदम यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या पदाचा आणि काँग्रेस प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देताना कोणावरही टीका टिप्पणी केली नाही. पण आजघडीला काँग्रेसमध्ये सुरू असलेली गटबाजी ही टोकाला पोहोचली आहे. त्यात कोणाचा पायपोस आता कोणाला राहिला नाही, हेही स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचा कारभार खासदार प्रा. रवींद्र चव्हाण आणि त्यांचे मामा नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हनुमंत बेटमोगरेकर यांच्याकडे आला आहे; मात्र या मामा भांजेकडून काँग्रेसला पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न होत नसल्याचे अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते खाजगीमध्ये बोलत आहेत. त्याचवेळी काँग्रेसला लागलेली गळती पाहता काँग्रेसचे नांदेडमधील वैभव रसातळाला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता काँग्रेसला लागलेली ही गळती रोखण्यात किती यश येईल, याकडेही लक्ष लागले आहे.
नांदेडमध्ये सुरू असलेल्या काँग्रेसच्या या गळतीच्या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष २८ मे रोजी नांदेडमध्ये येत आहेत. नांदेडमध्ये काँग्रेसला लोकसभेच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीतही यश मिळाले मात्र विधानसभेला एकही जागा मिळवता आली नाही. माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांची जागा भरून काढणे तर सोडा पण आहे ती लोक टिकवण्यातही काँग्रेसच्या नेत्यांना यश येत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. एकीकडून आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस तर आता भारतीय जनता पक्षानेही काँग्रेसमधील जुने नेते आपल्या पक्षात घेण्याची स्पर्धा सुरू केली आहे.
काका म्हणाले, आता साहेब सांगतील तसे..! काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देताना बी.आर. कदम यांनी काँग्रेसमध्ये काम करण्याची खूप मोठी गरज असल्याचे सांगितले. आपण आपल्या कार्यक्षेत्रातील उत्तर नांदेडमधील सर्व बुथ कमिट्या सज्ज केल्या आहेत. मात्र काँग्रेसमध्ये म्हणावे तसे काम होत नाही. कोणाचा पायपोस कुणाला राहिला नाही. आता कुठेतरी थांबावे लागेल, असेही ते म्हणाले. वयाची ७५ वर्ष पार केली आहेत. त्यामुळे कामातही अडचणी येत आहेत. आगामी राजकीय वाटचालीबद्दल त्यांना विचारले असता आता ‘साहेब सांगतील तसे’ असेही त्यांनी स्पष्ट केले. २६ मे रोजी होणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांच्या नांदेड दौऱ्यात भाजपा प्रवेश आहे का याबद्दल ‘बघू , साहेबांचा अजून निरोप आला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.