
नांदेड – स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ या उपक्रमास सुरुवात झाली आहे. याअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील १३१० ग्रामपंचायती अंतर्गत १५३२ गावांमध्ये स्वच्छता विषयक तपासणी होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिली आहे
या सर्वेक्षणात गावांतील स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार असून त्यामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांचा वापर, दृष्यमान स्वच्छता, ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, खतखड्डे, प्लास्टिक संकलन व त्याचे व्यवस्थापनाची पाहणी करण्यात येणार आहे. यादरम्यान घरोघरी भेट देऊन नागरिकांच्या स्वच्छतेविषयक सवयी, शौचालय वापर, कचरा व्यवस्थापन, हात धुण्याच्या सवयी, तसेच परिसरातील एकूण स्वच्छतेचा आढावा घेतला जाईल. यासोबतच शाळा, अंगणवाडी, बाजारपेठा, धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक शौचालये येथे स्वच्छता राखलेली आहे का, याचीही पडताळणी केली जाणार आहे.
या सर्वेक्षणासाठी एकूण १ हजार गुणांची मूल्यांकन पद्धती निश्चित करण्यात आली आहे, ज्यामध्ये- घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन १२० गुण, ग्रामस्थांचा प्रतिसाद व मानसिकतेतील बदल-१०० गुण, स्वच्छता सुविधांचा वापर- २४० गुण व प्रत्यक्ष निरीक्षण व प्रश्नावली- ५४० गुण असे एकूण १ हजार गुणाचे मुल्यांकन राहणार आहे.
या सर्वेक्षणासाठी सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पाणीपुरवठा समित्या आणि ग्रामस्थांनी एकजुटीने तयारीला लागावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक नारायण मिसाळ, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, महिला व बाल विकास विभागाचे प्रशांत थोरात व कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब यांनी केले आहे.