
नांदेड/कुंटूर – नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील राहेर येथील गोदावरी नदी पात्रातून दोन बोटीद्वारे बिनधास्तपणे वाळू उपसा केला जात आहे. दोन जेसीबी व दहा हायवाच्या साह्याने दिवस रात्र गेल्या पाच दिवसापासून वाळू वाहतूक केली जात आहे. या बाबीकडे महसूल प्रशासन आणि पोलीस दलही डोळेझाक करीत आहे. संपूर्ण जिल्हाभरात पावसाळा लांबल्याचा फायदा वाळूमाफिया घेत असून मोठ्या प्रमाणात आता वाळू उपसा केला जात आहे.
नायगाव तालुक्यातील राहेर येथे गोदावरी नदी पात्रातून दोन बोटींच्या सहाय्याने सक्शन पंपांनी वाळू काढली जात आहे. ही वाळू गोदावरी काठावरून जेसीबीने हायवा ट्रकमध्ये भरून विक्री केली जात आहे. जिल्ह्यात कुठेही वाळू उपसा करण्यास परवानगी नसताना या वाळू उपसा आणि वाहतुकीकडे महसूल अधिकारी, कर्मचारी कोणतीही कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामागे प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे गणित असल्याचेही स्थानिक नागरिक सांगत आहेत.
नायगाव तहसील कार्यालय महसूल विभागाकडून कोणतीच परवानगी हा वाळू उपसा करण्यासाठी मिळाली नसल्याचे स्पष्ट झाले. असे असेल तर मग अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला परवानगी दिली कोणी? हा प्रश्न पुढे आला आहे. तलाठी, मंडळ अधिकारी की जिल्हा स्तरावरील बड्या अधिकाऱ्यांकडून या वाळू उपसा करण्यास मूकसंमती मिळाली आहे का? ही बाबही आता संशोधनाची ठरली आहे. गेल्या पाच दिवसापासून बिनधास्तपणे वाळूमाफिया उपसा करून विक्री करत आहेत. राहेर सज्जाचे तलाठी डाकेवाड यांना माहिती विचारली असता त्यांनी सांगितले, सदर ठिकाणी वाळू उपसा चालू असून याबाबत कोणतीही परवानगी घेतलेली नाही. मात्र ही वाळू एका मंदिराच्या बांधकामासाठी काढत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे परवानगी घेता येत नाही असे सांगून त्यांनी फोन बंद केला. राहेर येथून बिनधास्तपणे पाच दिवसांपासून वाळू वाहतूक करून उखळ पांढरे करणारे वाळूमाफियांनी महसूलच्या काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हा उपसा सुरू केला असल्याचेही स्पष्ट होत आहे.
वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी नायगाव तालुक्यातील कुंटूर व परिसरातील राहेर गोदावरी नदी पात्रातील रेतीला परवानगी दिली कोणी याची चौकशी करण्यात यावी, सदर अवैध वाळू वाहतूक दहा हायवा व दोन जेसीबीच्या सहाय्याने बिनधास्तपणे दिवस रात्र केला जात आहे. यामुळे लाखो रुपयाचा महसूल बुडाला आहे. एकीकडे घरकुलधारकांनाही वाळू दिली जात नाही ; परंतु बोटीच्या सहाय्याने दिवस रात्र वाळू उपसा सुरू असताना नायगाव तहसीलदार मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.