क्राईम

नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्धच्या वेगवेगळ्या ऑपरेशनमध्येही येळी – महाटीत आठ ते दहा महाकाय बोटी..!

गोदावरी नदीतून खुलेआम सुरू आहे वाळू उपसा आणि वाहतूकही, वाळू माफियाविरुद्ध प्रशासनाने हात टेकल्याचेच झाले स्पष्ट..!

नांदेड – जिल्ह्यात पोलीस दलाच्या वतीने वेगवेगळ्या अवैध धंद्याविरुद्ध ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत कारवाई केली जात आहे. त्याचवेळी विशेष पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाकडूनही अवैध व्यवसाय विरोधी अभियान – २ राबविले जात आहे. मात्र अवैध धंद्याविरुद्ध सुरू असलेल्या या अभियान काळातही जिल्ह्यात पोलीस आणि महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून वाळूमाफिया आपला अवैध धंदा कोणत्याही परिस्थितीत थांबवायला तयार नाहीत. त्यामुळे कारवाई करणाऱ्यांनीच आता हात टेकले की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोहा आणि मुदखेड तालुक्याला जोडणाऱ्या येळी – महाटी पुलाखालून वाहणाऱ्या गोदावरी नदीत आजघडीला आठ ते दहा महाकाय बोटीने खुलेआम वाळू उपसा केला जात आहे. या पुलावरून ये जा करणारे नागरिक वाळू उपसा करणाऱ्या या महाकाय बोटी पाहून तोंडात बोट घालत आहेत. या भागात अवैध धंद्यांना विशेष सूट दिली काय असा प्रश्नही हे चित्र पाहून उपस्थित होत आहे.

येळी – महाटी पुलाच्या दोन्ही बाजूला गोदावरी नदीतून मोठ्या बोटीने वाळू उपसा केला जात आहे. आजघडीला येथे आठ ते दहा बोटीने उपसा केला जात आहे. हा उपसा करून थेट सक्शन पंपाद्वारे वाळू नदीकाठी आणली जाते. नदीकाठी जेसीबी मशीनच्या सहाय्याने शेकडो हायवा ट्रक, टिप्परद्वारे वाळूची अवैध वाहतूक केली जात आहे. हा सर्व प्रकार खुलेआम, भरदिवसा सुरू आहे. असे असतानाही कारवाई मात्र का केली जात नाही हाही प्रश्नच आहे. काही दिवसापूर्वी स्थानिक गुन्हा शाखेने येथे कारवाई केली होती; मात्र ही कारवाई चर्चेची ठरली होती. येळी, महाटी घाटावरून काढली जाणारी वाळू नांदेडसह मुदखेड, लोहा, नायगाव तसेच पर जिल्ह्यातही नेली जात आहे. यासाठी अनेक जेसीबी मशीन्स, शेकडो टिप्पर, हायवा ट्रक रस्त्यावरून वाहतूक करत आहेत. मात्र कारवाई जिथे बिनसले तेथे एक दोन वाहनावरच करून समाधान मानले जात आहे. त्यातही कारवाईची जबाबदारी पोलिसांनीच उचलली आहे. महसूल अधिकारी मात्र गौण खनिजाची जबाबदारी आपल्या विभागावर असतानाही कारवाई करण्यापासून लांबच आहेत. एकूणच सर्व संमतीने होत असलेला हा वाळू उपसा कोट्यवधींची कमाई करून देणारा आहे, हेही निश्चित. पाऊस लांबल्याने जिल्ह्यात वाळू माफियांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. याच संधीचे सोने करून घेण्यासाठी लगबग आता वाढली असून दिवस रात्र वाळू उपसा केला जात आहे.

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा भार स्वीकारताच ऑपरेशन फ्लश आउट या मोहिमेची घोषणा केली होती. आजही ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत जिल्ह्यात वेगवेगळ्या कारवाया सुरू आहेत. या ऑपरेशन अंतर्गत प्रारंभी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचेही कंबरडे मोडले होते; मात्र पुढे ऑपरेशन फ्लश आउटमधून अवैध वाळू उपसा करणाऱ्या विरुद्धची कारवाई थंडावत गेली. जिल्ह्यातील अनेक भागात विशेषतः लोहा, नांदेड, मुदखेड या तालुक्यातील गोदाकाठावरून शेकडो वाहनांच्या सहाय्याने वाळू सुरू असताना केवळ एखादी दोन वाहने पकडून कारवाईचा फार्स केला जात आहे. स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार तसेच पोलिसांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात वाळूचा केला जात आहे. संपूर्ण जिल्ह्यात अशीच परिस्थिती असून आता पावसाळ्यात पाऊस लांबल्याने या वाळू उपसाला गती आली आहे. मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असलेला पाहून सामान्य नागरिकही अधिकाऱ्यांना धरूनच हा सर्व प्रकार सुरू असल्याची चर्चा करत आहेत. त्यांच्या मूक संमतीशिवाय कुठेही वाळू उपसा होऊ शकत नाही, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.

  • पोलीस विभागाकडून काही प्रमाणात कारवाई सुरू असली तरीही दुसरीकडे महसूल विभागाने मात्र अवैध वाळू उपसा करणाऱ्याविरुद्ध कारवाई करायचीच नाही, असा ठाम निर्धार केल्याचेच स्पष्ट झाले आहे. पर्यावरण रक्षण, नदी संवर्धन या विषयांना प्राधान्य असल्याचे सांगणाऱ्या नांदेड जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकारी या अवैध वाळू उपशाला थेट संमतीच देत आहेत की काय असेच चित्र आहे. स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार आपल्याला कारवाईपासून रोखले जात असल्याचे सांगत आहेत. वरूनच सर्व मॅनेज आहे, असा थेट संदेशही दिला जात आहे.

जिल्ह्यातील ६६ वाळू घाटांचा प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे; एकाही घाटावरून वाळू उपसा करण्यास परवानगी नाही… राज्य शासनाने वाळू उपसासाठी नवीन धोरण आखले आहे या नवीन धोरणअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील ६६ वाळू घाटांचा प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे जिल्हा गौण खनिज विभागाने पाठवला आहे. या ६६ वाळू घाटावरून वाळू उपसा करण्यास परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला अद्यापही परवानगी मिळाली नाही. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून एकाही घाटावरून वाळू उपसा करण्यास अधिकृत परवानगी नाही; मात्र आजघडीला एकही घाट असा नाही जिथे वाळू उपसा बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यात पर्यावरणाच्या हानीसह महसूल विभागाला आपल्या उत्पन्नालाही मुकावे लागत आहे. शासनाच्या तिजोरीत उत्पन्न येत नसले तरीही एकूणच सुरू असलेला वाळू उपसा पाहता वाळू माफियांचे मात्र उत्पन्न सुरूच असल्याचेच स्पष्ट झाले आहे. या उत्पन्नाला कोणाकोणाची साथ मिळत आहे, हे सामान्य जनताही जाणून आहेच.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!