
नांदेड – मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी पायात भिंगरी घालून फिरणारे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आ. बालाजी कल्याणकर यांची प्रकृती शनिवारी मध्यरात्री अचानक बिघडल्यामुळे त्यांना तातडीने खाजगी वाहनाने मुंबईला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. ऐन वाढदिवसाच्या दिवशीच त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. आज रविवारी होणाऱ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावरही एकूणच चिंतेचे सावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आमदार कल्याणकर यांनी काही दिवसापूर्वीच त्यांनी नांदेडच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये सलग पाच दिवस उपचार घेतला. त्यांना अतिउच्च तापासह रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्यामुळे उपचारासाठी तातडीने मुंबईच्या उच्च सुविधायुक्त रुग्णालयात दाखल करून तेथे उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ऐन वाढदिवसाच्या दिवशीच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंता पसरली आहे. आज एक जून रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमावर चिंतेचे सावट पसरले आहे.
आमदार कल्याणकर यांचा १ जून रोजी वाढदिवस आहे. परंतु, प्रकृतीच्या कारणामुळे वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आमदार कल्याणकर हे स्वतः उपस्थित राहू शकणार नाहीत. परंतु शिवसेनेचे पदाधिकारी व कल्याणकर कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन लोकोपयोगी उपक्रमांचे सर्व कार्यक्रम वेळेवर करावेत, असे आवाहन आ. कल्याणकर यांनी त्यांच्या चाहत्यांना केले आहे.
नांदेडमधील बदलत्या राजकीय परिस्थितीचा त्यांच्या प्रकृती अस्वस्थतेशी काही संबंध आहे का अशी चर्चाही आता सुरू झाली आहे. शिंदे सरकारच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उजवे हात समजले जाणारे आमदार कल्याणकर हे आता राजकीय पातळीवरून पूर्णपणे बाजूला सारले गेले आहेत. त्यांनी मंजूर केलेल्या अनेक कामांना ब्रेकही लागल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर ते मंत्रीपदाच्या शर्यतीत होते. त्यांनाही तशी अपेक्षा होती; मात्र स्थानिक पातळीवरील काही नेते आणि पक्षातीलच काही नेत्यांच्या विरोधामुळे ते मंत्री होऊ शकले नाहीत. त्यात आता नांदेडमध्ये पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सगळी सूत्रे हाती घेतली आहेत. माजी खासदार तथा विधान परिषदेचे आमदार शिवसेना नेते हेमंत पाटील हेही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्णपणे ॲक्टिव्ह झाले आहेत. या सर्व परिस्थितीत पक्ष आणि स्थानिक पातळीवरही कल्याणकर यांचा दबदबा पूर्वीच्या सरकारसारखा उरला नसल्याने ते गेल्या काही दिवसांपासून निराशेच्या गर्तेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच स्थानिक पातळीवर नांदेड शहरासह परिसरातील गावांचा विकास करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी शिवसेना नेते हेमंत पाटील यांनी लावून धरली होती. या मागणीला माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक पाठिंबाही दिला होता. आ. कल्याणकर यांचा मात्र या मागणीला विरोध होता. मात्र तो विरोध ते स्पष्टपणे उघडही करू शकले नव्हते. त्यामुळे त्यांची सर्वच पातळीवर होणारी मुस्कटदाबी ही त्यांच्या प्रकृती बिघडण्याचे कारण मानले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आमदार कल्याणकर यांना वाढदिवसाच्या दिवशीच थेट मुंबईला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी चिंता पसरली आहे.
लवकरच जनतेच्या सेवेत दाखल होऊ – आमदार कल्याणकर यांचा विश्वास…नांदेड उत्तर मतदार संघातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह जनतेचे आशीर्वाद व शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत आणि त्या मी विनम्रपणे स्वीकारत असल्याची भावना आ. कल्याणकर यांनी व्यक्त केली आहे. वाढदिवसानिमित्त आपण स्वतः कोणालाही भेटू शकत नाही तसेच दूरध्वनीवर बोलू शकणार नाही, याबद्दल मनाला खंत आहेच! त्यामुळे पुष्पगुच्छ, हार, तुरे, फटाके, आतिषबाजी यात कोणताही अनाठायी खर्च न करता चाहत्यांनी केवळ सामाजिक माध्यमातून शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत उपचार पूर्ण होऊन बरे झाल्यानंतर लवकरच जनतेच्या सेवेत दाखल होऊ. त्यावेळी सर्वांच्या शुभेच्छा पुन्हा एकदा स्वीकारू, असा विश्वास व्यक्त करून वाढदिवसानिमित्त जनतेच्या मनात असलेल्या भावनेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.