
नांदेड – बिलोली तालुक्यातील गंजगाव येथील गट क्रमांक ३३५ मध्ये वाळू उपसा करण्याची परवानगी दिलेल्या ठेकेदाराकडून अटी आणि शर्तीचा भंग करत घरकुल घरकुल साठी राखीव ठेवलेल्या गट क्रमांक २८० मधून अवैधरित्या आठ जेसीबी मशीन आणि दोन सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा करून तब्बल ५ ते ७ हजार ब्रास वाळूचा साठा केल्या प्रकरणी ठेकेदार श्रीमती सागरबाई बाजीराव पाटील यांना बिलोली उपविभागीय अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. २६ जून रोजी बजावलेल्या या कारणे दाखवा नोटीसचे अद्यापही ठेकेदाराकडून उत्तर प्राप्त झाले नाही.
गंजगाव येथील गट क्रमांक ३२५ मध्ये श्रीमती सागरबाई बाजीराव पाटील यांच्या नावाने शासनाचा आणि जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशाच्या अटी व शर्ती भंग करत खाजगी रेती धक्काची परवानगी मिळवण्यात आली. त्यानंतर तेलंगणातील श्रीनिवास राव आणि गंगप्पा नामक व्यक्तीने घरकुलासाठी राखीव ठेवलेल्या गंजगाव येथील गट क्रमांक २८० मधून वीरभद्र परबता कनकशेटे यांच्या गटालगत आणि गटात अवैधरित्या मोठ्या प्रमाणात ८ पोकलेन मशीन आणि दोन सक्शन पंपाद्वारे लागवडी योग्य जमिनीवर अवैधरित्या पाच ते सात हजार वाळूचा ब्रास वाळूचा साठा करण्यात आला आहे. हा वाळू साठा जप्त करून घरकुल लाभधारकांना मोफत वाटप करावा आणि शासनाची दिशाभूल करणाऱ्या तसेच अटी शर्तीचे भंग करणाऱ्या ठेकेदार सागरबाई पाटील यांच्यावर तसेच त्यांच्याशी हात मिळवणी करून अवैध रित्या वाळू उपसा करणाऱ्या तेलंगणातील श्रीनिवास राव आणि गंगाप्पा नामक व्यक्तीवर तात्काळ फौजदारी आणि दंडात्मक कारवाई करावी, हा धक्का बंद करावा अशी मागणी राहुल जिगळेकर आणि शंकर तमनबोईनवाड यांनी केली आहे. अशी कारवाई न झाल्यास त्यांनी ३० जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आत्मदहनाचा इशाराही दिला आहे.
या तक्रारीच्या अनुषंगाने बिलोलीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी चौकशी केली असता गंजगाव येथील खाजगी रेती घाटामधून रेती उत्खननासाठी परवानगी आणि त्यानुसार ताबा देण्यात आला आहे; परंतु ठेकेदार सागरबाई पाटील यांच्याकडून आदेशातील नमूद अटी आणि शर्तीचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचवेळी घरकुलासाठी राखीव ठेवलेल्या गटातून गट क्रमांक २८० मधून वीरभद्र परबता कनकशेटे यांच्या गटालगत आणि गटात अवैधरित्या ८ पोकलेन मशीन आणि दोन सक्पंशन पंपाद्वारे लागवडी योग्य जमिनीवर अवैधरित्या ५ ते ७ हजार ब्रास वाळू साठा असल्याचे नमूद केले आहे. ही बाबही गंभीर स्वरूपाची असल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. परवानगी दिलेल्या जागेतून वाळूचे उत्खनन केलेच आहे परंतु इतर ठिकाणाहूनही वाळू उपसा केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या ठेक्यातील अटी आणि शर्तीचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत ठेकेदाराकडून तातडीने २४ तासाच्या आत म्हणणे सादर करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी दिले आहेत. ठेकेदाराकडून खुलासा प्राप्त न झाल्यास कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल असेही नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, २६ जून रोजी दिलेल्या या नोटीस नंतरही कोणताही खुलासा ठेकेदार श्रीमती सागरबाई बाजीराव पाटील यांनी अद्यापही दिला नसल्याचे उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी स्पष्ट केले आहे.