
नांदेड – भारताने यशस्वी केलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानचा दहशतवादी कारवायामध्ये असलेला सहभाग उघड करण्यासाठी देशाचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ जगभरातील वेगवेगळ्या देशात गेले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या काही खासदारांचाही यात समावेश असतानाही शिवसेनेच्या एका नेत्याने ‘ ही कुणाची वरात आहे’ अशी टिप्पणी केली आहे. त्यामुळे शिवसेना आज नेमकी कोणत्या दिशेने जात आहे, असा प्रश्न करत हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांनी गळाभेट घेतली असती, असा विश्वास देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने जगाला आत्मनिर्भरतेचा आणि आत्मसन्मानाचा संदेश दिला असल्याचेही शहा यांनी स्पष्ट केले.
गृहमंत्री अमित शहा हे सोमवारी दुपारी नांदेड दौऱ्यावर आले यावेळी नवा मोंढा मैदानातील शंखनाद सभेत ते बोलत होते. या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री अतुल सावे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, रावसाहेब दानवे डॉ. भागवत कराड, खा. डॉ. अजित गोपछडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. गृहमंत्री शहा म्हणाले, भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले. यातून भारत आपला आत्मसन्मान राखण्यासाठी सक्षम आहे हाच संपूर्ण जगाला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून संदेश पोहोचला आहे. पाकिस्तानही आता भारताची कुरापत काढण्याची हिम्मत करणार नाही; कारण भारताने घेतलेला बदला पाकिस्तानच्या अनेक पिढ्यांना आठवणीत राहणारा आहे, असेही शहा यांनी स्पष्ट केले.
ऑपरेशन सिंदूर समवेत भारतात ब्लॅक फॉरेस्ट ऑपरेशन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरू आहे. छत्तीसगडमध्ये ५ हजार फूट उंच पहाडी भागामध्ये सीआरएफ, छत्तीसगड पोलीस तसेच बीएसएफ जवानांनी केलेल्या कारवाईत ३१ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन केले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भारताने सिंधू जल करार रद्द केल्याचेही त्यांनी सांगितले. रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही, व्यापार आणि दहशतवाद हेही एकत्र राहणार नाही हे भारताने पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ठणकावून सांगितल्याचे शहा यांनी स्पष्ट केले. मराठवाड्यातील दुष्काळ संपण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पामुळे मराठवाड्याला आगामी पाच वर्षात पाणी मिळेल. कोकण आणि कृष्णेचे पाणी मराठवाड्यात आणले जाईल, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही देशाच्या आत्मसन्मानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज गृहमंत्री अमित शहा कणखर निर्णय घेत असल्याचे सांगितले. मराठवाड्याच्या विकासासाठीही महायुती सरकार मोठ्या प्रमाणावर कामे करीत आहे. मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी १ लाख कोटी रुपये खर्चून नदीजोड प्रकल्प सुरू असल्याचे ते म्हणाले.
मराठवाड्यात शत प्रतिशत भाजप – अशोकराव चव्हाण… माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप क्रमांक एकचा पक्ष राहिल, असे सांगताना शत प्रतिशत भाजपच असा नारा दिला. नांदेडमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजपाच राहील, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला. विकसित भारतामध्ये विकसित महाराष्ट्र असावा, महाराष्ट्रातील मराठवाडा आणि त्यातही नांदेड ,परभणी हिंगोली या भागांचाही विकास व्हावा. यासाठी या मराठवाड्यात गुंतवणूक वाढावी, रोजगार मिळावा यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जावेत, राज्याचा विकासाचा रोडमॅप तयार आहेच ; पण मराठवाड्याच्या विकासाचा रोड मॅप आगामी काळात होईल, असा उल्लेखही चव्हाण यांनी केला. नांदेड – बिदर, नांदेड – लातूर हे नवे रेल्वे मार्ग यासह बुलेट ट्रेन सुरू व्हावी, मुंबईला जोडणारा समृद्धी महामार्गही पूर्ण व्हावा अशी अपेक्षाही चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली. भारताची अर्थव्यवस्था आज पाचव्या क्रमांकावरून जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकावर पोहोचली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. यामागे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खंबीर नेतृत्व असल्याचेही ते म्हणाले.