
नांदेड – जिल्ह्यात पोलीस दलाच्या वतीने अवैध धंद्यांचा बिमोड करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत मंगळवारी देगलूर – उदगीर रस्त्यावर कारेगाव येथे स्वस्त धान्य दुकानातील धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असल्याच्या संशयावरून एक ट्रक पोलिसांनी पकडला आहे. जवळपास सव्वा लाख रुपयांचे धान्य या कारवाईत पोलिसांनी जप्त केले आहे.
ऑपरेशन प्लॅश आऊट अंतर्गत जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यात सहा विशेष पथके स्थापन केले आहेत. या पथकाने १० सप्टेंबर रोजी देगलूर ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदाराने दिलेल्या माहितीवरुन देगलूर ते उदगीर रोडवर मौजे कारेगांव येथे एमएच २६ बीडी ८०५१ क्रमांकाचे वाहन थांबवून तपासणी केली. त्या वाहनात गहू व तांदळाने भरलेले ११५ कट्टे आढळून आले. या धान्याची किमत अंदाजे १ लाख २० हजार रुपये इतकी आहे. हे धान्य रेशनचेच असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे सदर ट्रक ज्याची किंमत २२ लाख रुपये आणि सव्वा लाख रुपयांचे धान्य असा एकूण २३ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेउन पोलीस स्टेशन देगलूर येथे हजर करण्यात आले आहे. सदर प्रकरणी पुरवठा विभागाचा अहवाल मागवून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सपोनी व्ही.एस. आरसेवार, पोहेकॉ पोतदार, मुंढकर, तलवारे, पोकॉ येंगाले, वाघमारे यांनी पार पाडली. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्वस्त धान्य दुकानात असतील धान्य लाभार्थ्यांना वाटप न होता थेट काळा बाजारात जात आहे. याबाबत जिल्हा प्रशासन, पुरवठा विभाग यांच्याकडून अद्याप कोणताही शोध घेतला गेला नाही. कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा काळा बाजार थांबवण्यासाठी जिल्हा पुरवठा विभाग तसेच तालुकास्तरावर पुढाकार घेतला जाईल की नाही, हेही पहावे लागणार आहे.
कुंटूर फाटा येथील धान्य कोणाचे..? ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत नांदेड पोलिसांनी कुंटूर फाटा येथे एका गोदामावर छापा मारत धान्यसाठा जप्त केला होता. येथील काही धान्य हे महिला बाल वकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत बालके आणि गरोदर माता यांना देण्यासाठी असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र उर्वरित धान्य आमचे विभागाचे नसल्याचा स्पष्ट खुलासा महिला व बालकल्याण विभागाने केला होता. त्यामुळे पोलिसांनी पकडलेले धान्य नेमके कोणाचे होते याचा खुलासा अद्यापही झाला नाही. त्याचवेळी महिला व बालविकास विभागाने या छाप्यात आढळलेल्या काही मालाप्रकरणी कोणती कारवाई केली हेही गुलदस्त्यातच आहे. अर्धापूर येथे मात्र पोलिसांनी बड्या हस्तीविरुद्ध कारवाई केली आहे.