
नांदेड – नायगाव तालुक्यातील राहेर येथे गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेला अवैध वाळू उपसा ‘नांदेड स्क्रिप्ट’च्या वृत्तानंतर केवळ तीन तासात थांबला आहे. ‘नांदेड स्क्रिप्ट’ वृत्तानंतर कुंटूर पोलीस आणि नायगाव तहसीलचे पथक संयुक्तरित्या राहेर येथे धडकले; मात्र या पथकाच्या येण्याची माहिती वाळू माफीयांना मिळाली होती. त्यामुळे संपूर्ण साहित्यासह वाळूमाफीयांनी तेथून आपला गाशा गुंडाळला होता. या पथकाने १० ते १२ ब्रास वाळूसाठा या कारवाईत जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानंतर तातडीने कारवाई संदर्भातील हालचाली सुरू झाल्या आणि राहेर येथील हा अवैध वाळू उपसा बंद करण्यात आला.
राहेर येथे अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास कुंटूरचे मंडळ अधिकारी आर. के. पवार, राहेरचे तलाठी बाबुराव डाकेवाड, कुंटूर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल भोसले, बीट प्रमुख विश्वंभर निकम, राहेर पोलीस चौकीचे पो कॉ. अंगद बाराळे आदींनी राहेर येथे गोदावरी पात्रालगत भेट देऊन पाहणी केली. पोलिस आणि महसूलचे हे संयुक्त पथक पोहोचण्यापूर्वीच वाळू माफियांनी संपूर्ण साहित्यासह येथून पोबारा केला होता. अवघ्या दोन तासात हे संयुक्त पथक धडकले, कारवाई केली. एकूणच कारवाईनंतर राहेर येथील वाळू उपसा बंद झाला. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी या प्रकरणात तातडीने कारवाईचे आदेश दिले.
नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील राहेर येथील गोदावरी नदी पात्रातून बोटीद्वारे बिनधास्तपणे वाळू उपसा केला जात होता. दोन जेसीबी व दहा हायवाच्या सहाय्याने दिवस रात्र गेल्या पाच दिवसापासून वाळू वाहतूक केली जात होती. या बाबीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे वृत्त ‘नांदेड स्क्रिप्ट’ ने प्रसिध्द केले. जिल्हाभरात पावसाळा लांबल्याचा फायदा वाळूमाफिया घेत असून मोठ्या प्रमाणात आता वाळू उपसा केला जात आहे. नायगाव तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड या प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे आठ दिवसाच्या रजेवर आहेत. तहसीलचा पदभार प्रभारी अधिकाऱ्याकडे सोपविला आहे. याचाच फायदा नायगाव तालुक्यात वाळू माफिया मोठ्या प्रमाणात घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात कुठेही वाळू उपसा करण्यास परवानगी नसताना या वाळू उपसा आणि वाहतुकीकडे महसूल अधिकारी, कर्मचारी कोणतीही कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट झाले. पावसाळा लांबल्याने वाळू माफियांचे चांगलेच फावले आहे. अनेक ठिकाणी वाळू माफियांनी आता वाळू उपसा करण्याला गती दिली आहे. नांदेड जिल्हाधिकारी हे पर्यावरण रक्षणासाठी प्राधान्य देणार असे प्रारंभी सांगण्यात आले. मात्र एकूणच त्यांचा पार पडलेला कार्यकाळ पाहता वाळू माफियांना रोखण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी कोणतीही मोठी कारवाई जिल्ह्यात झाली नसल्याचेच स्पष्ट होत आहे.