
नांदेड – भारतीय जनता पार्टीने भारतातील सर्वच पक्ष फोडले आहेत. देशातील कोणतेही असे राज्य नाही जेथे भाजपाने पक्ष फोडला नाही. त्यावेळी नांदेडला मला कधी प्रचाराला यावं लागेल असं कधी वाटलं नाही असं प्रतिपादन माजी शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले. नांदेडन लातूरला घडवलं हे सांगताना लातूर आणि नांदेडचे ऋणानुबंध कायम राहतील असे देशमुख यांनी आज बुधवारी स्पष्ट केले.
काँग्रेस उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी लोकसभेसाठी उमेदवारी दाखल केल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. महाविकास आघाडीकडून माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी आज बुधवारी शक्ती प्रदर्शन करत आपली उमेदवारी दाखल केली. जुना मोंढा येथून भव्य रॅली काढण्यात आली होती. माजी मंत्री अमित देशमुख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. उमेदवारी दाखल झाल्यानंतर शहरातील गुरुद्वारा मैदानावर जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत देशमुख यांनी काँग्रेसचा प्रवास सांगताना माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण ते वसंतराव चव्हाण असा नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचा प्रवास झाला असल्याचे सांगितले. नांदेड आणि लातूरचे जुने ऋणानुबंध आहेत. नांदेडनेच लातूरला घडवले. हे ऋणानुबंध यापुढेही आपण कायम जपू असे त्यांनी स्पष्ट केले. मराठवाड्यात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देशातील आणि राज्यातील राजकारण पाहता महाराष्ट्रातील जनतेने आता कुणाच्या पाठीशी राहायचे याचा निर्णय घ्यावा असे ते म्हणाले. लोकसभा निवडणूक धनदांडगे विरुद्ध सामान्य नागरिक अशी होत आहे. अशा लढतीत सामान्य नागरिक नेहमीच विजयी झाला आहे. या निवडणुकीतही काँग्रेसचे वसंतराव चव्हाण निवडून येतील असेही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी खासदार सुभाष वानखेडे यांनीही भाजपाने सत्तेचा दुरुपयोग करून वेगवेगळ्या नेत्यांना पक्षात घेतल्याचे सांगितले. नांदेडचा नेताही भ्रष्टाचारामुळेच भाजपात गेला असल्याचे ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील कदम, काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल सत्तार, सुरेंद्र घोडजकर, आमदार मोहन हंबर्डे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, शेकाप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आशाताई शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या सभेचे प्रास्ताविक माजी आमदार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांनी केले. सभेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, माजी सभापती संजय बेळगे, आनंदराव चव्हाण, रवींद्र चव्हाण, श्रीनिवास मोरे, कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण, सुभाष रायबोळे आदींनी परिश्रम घेतले.
काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी भाजपा सरकारच्या गप्पांमध्ये आता येऊ नका हे सांगताना ही लढाई सर्वसामान्य विरुद्ध धनदांडगे अशी असल्याचे ते म्हणाले. भाजपाने सत्तेचा गैरवापर केल्याची टीकाही त्यांनी केली. नांदेडमध्ये होणाऱ्या सभेसाठी हिंगोली गेट परिसरातील फटाका मैदानावर सभेसाठी परवानगी घेण्यात आली होती. मात्र सत्तेचा वापर करून ती परवानगी नाकारली. मात्र गुरुद्वारा बोर्डाने गुरुगोविंद सिंघजी संग्रहालयाजवळील मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आभारही मानले. दादागिरीला कसं उत्तर द्यायचे हे वसंतरावांना चांगलं माहीत असल्याचे सांगत त्यांनी आगामी काळात लढण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. आपल्या प्रकृतीबाबत वावड्या उठवल्या जात आहेत. मात्र मला काय झाले आहे असे म्हणून त्यांनी भर सभेतच दंड थोपटून ‘या मैदानात’ असे आव्हानही दिले.