
नांदेड – लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत सर्व पक्षांना आपली भूमिका जनतेपर्यंत नेण्याचा अधिकार आहे. निवडणुकांमध्ये प्रचार करणे हाही घटनेने दिलेला अधिकार आहे. त्यामुळे आता कोणालाही आणि कुठेही गावबंदी करता येणार नाही. गावात येण्यापासून कुणालाही रोखण्याचा प्रयत्न केला तर कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे.
सोमवारी लोकसभा निवडणुकी अंतर्गत उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघात किती उमेदवारांनी माघार घेतली आणि किती उमेदवार रिंगणात आहेत याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी माध्यमांना माहिती दिली. नांदेड लोकसभा मतदार संघात आता २३ उमेदवार रिंगणात आहेत. लोकसभा निवडणूक ही शांततापूर्ण आणि पारदर्शक वातावरणात होण्यासाठी प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या उपायोजनांचीही त्यांनी माहिती दिली. दुसरीकडे आता उमेदवार निश्चित झाल्यानंतर प्रचाराला वेग येणार आहे या प्रचार काळात कोणालाही प्रचारापासून रोखता येणार नाही असे ते म्हणाले गावबंदी बाबत त्यांनी कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यात अनेक गावांमध्ये गावबंदी करण्यात आली असून राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते, नेत्यांना गावांमध्ये आल्यास त्यांना हाकलून लावले जात आहे. अनेक गावाच्या प्रवेशद्वारावरच मोठमोठे फलक लावण्यात आले आहेत. मात्र सध्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीत सर्वांना प्रचार करण्याचा अधिकार आहे. या संदर्भात न्यायालयानेही स्पष्ट निर्देश दिले आहेत.
कोणतीही गावबंदी करता येणार नाही हे न्यायलयाने स्पष्ट केले आहे. जर असे कुठे होत असेल तर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या आदेशाची जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे न्यायालयाच्या या निर्देशानंतर आता कोणीही गावबंदीचा निर्णय लादला तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असे जिल्हाधिकारी राऊत म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जिल्ह्यात ६६ गावांनी गावबंदी बाबत जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे कळवले होते. मात्र यापुढे असा कोणताही निर्णय घेता येणार नाही, कोणालाही गावबंदी करता येणार नाही.
मराठा आरक्षणासाठी होत असल्या गावबंदीचा फटका माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनाही नुकताच बसला होता. अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील काही तरुणांनी गावातून बाहेर काढले होते. तर माजी आमदार अमिता चव्हाण यांनाही मुदखेड तालुक्यात असाच अनुभव आला होता. अर्धापूर तालुक्यात कोंढा येथे झालेल्या प्रकरणात पोलिसांनी स्वतःहून गुन्हे दाखल केले आहेत. आगामी काळातही ही कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकारी राऊत यांनी स्पष्ट केले.