
नांदेड – दहीहंडीत नाचण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर त्यामध्ये समेट घडवण्यासाठी शुक्रवारी एकत्र आलेल्या युवकांमध्ये पुन्हा वाद होऊन एका युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना शहरातील राज कॉर्नर येथे भरदिवसा मुख्य रस्त्यावर घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.
दहीहंडीत नाचण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर शुक्रवारी दुपारी नांदेड शहरातील राज कॉर्नर भागातील एका हॉटेलमध्ये समेटाची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी हे तरुण एकत्र आले. चर्चा करत असताना त्यांच्यात वाद झाला. हा वाद थेट रस्त्यावर आला आणि हाणामारीत त्याचे रूपांतर झाले. यावेळी वैभव दत्तात्रय दुधाटे याच्यावर चाकूने वार करण्यात आले. यात तो गंभीर जखमी झाला. दुसरा युवक कृष्णा धोंडीबा मुळे रा. तरोडा हाही जखमी झाला आहे. हा वाद, हाणामारी मुख्य रस्त्यावर झाल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले होते. काही वेळ वाहतूकही ठप्प झाली होती. घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भाग्यनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी धावले. त्यांनी जखमी वैभव दुधाटेला रुग्णालयात पोहोचविले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी अंकुश प्रकाश इंगोले राहणार सहयोगनगर याला अटक केली. इतर आरोपींचा ही पोलीस दलाच्या वतीने शोध घेण्यात येत आहे. नांदेड शहरातील गेल्या पंधरा दिवसातील हा चौथा खून झाला आहे.
संवेदनशील नांदेड शहरातील सर्वच ठाणेदारांच्या नियुक्तीचा फेरविचार आवश्यक…नांदेड शहर आणि जिल्हाभरात आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. मात्र दुसरीकडे शहरात गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र असून गेल्या पंधरा दिवसात वेगवेगळ्या प्रकरणात चार खुनाच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी घडलेली घटना तर शहरवासीयांच्या मनात भीतीचा थरकाप उडवणारी घटना आहे. भर दुपारी वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर चाकूने भोसकून युवकाचा खून करण्यात आल्याने आगामी काळात सण, उत्सवात शांतता राखण्याचे मोठे आव्हान नांदेड पोलीस दलापुढे उभे राहिले आहे. वाढत्या घटना पाहता नूतन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार आणि अपर पोलीस अधीक्षकांना नांदेड शहरातील ठाणेदारांच्या नियुक्तींचा निश्चितच आता फेरविचार करावा लागणार आहे. त्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेलाही आता आगामी काळात सजग राहून कार्य करावे लागणार आहे. तर शहरात सक्षम, कार्यक्षम उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची गरज प्रामुख्याने जाणवत आहे. त्याचवेळी मोठा विस्तार असलेल्या भाग्यनगर आणि नांदेड ग्रामीण ठाण्याचा पदभार देताना सक्षम अधिकारी नियुक्तीचा पोलीस प्रमुखांना विचार करावा लागणार आहे.