
नांदेड – जिल्हा पोलिसांच्या ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत रेशनचा काळाबाजार चव्हाट्यावर आला आहे. उमरी – तळेगाव रस्त्यावर रेशनचे धान्य घेऊन जाणारे दोन ट्रक पोलिसांनी पकडले आहेत. जवळपास ५ लाखाचे गहू व तांदूळ आणि दोन्ही ट्रक असा मिळून ४५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईत जप्त केला आहे. जिल्ह्यातील रामतीर्थ पोलीस ठाणे अंतर्गत शंकरनगर रस्त्यावरही तब्बल १७ टन तांदूळ पोलिसांनी जप्त केला होता. त्या कारवाईत २२ लाख २० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दोन दिवसातच ७० लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे.
पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक आणि उमरी पोलीस ठाण्याचे अधिकारी हे शनिवारी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनंतर उमरी – तळेगाव रस्त्यावर एमएच २६ बीई ७३३७ क्रमांकाच्या ट्रकमध्ये रेशनचे ४ लाख रुपयांचे गहू आणि एमएच २६ बी ई ७८३५ क्रमांकाच्या ट्रकमध्ये तांदळाचे कट्टे आढळले.हा जवळपास १ लाख रुपयांचा तांदूळ होता. पोलिसांनी ही दोन्ही वाहने पकडले आहेत. दोन्ही वाहने उमरी पोलीस स्टेशन येथे लावली आहेत. या कारवाईत ५ लाखाचे धान्य आणि ४० लाख रुपयांची वाहने असा ४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर प्रकरणी पुरवठा विभागास पत्रव्यवहार करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
रामतीर्थ हद्दीतील शंकरनगर रस्त्यावरही एका ट्रकमधून स्वस्त धान्य नेले जात असल्याची माहिती विशेष पथकातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळाली. या माहितीवरून एमएच २६ बीई ७०१२ क्रमांकाचा ट्रक पकडून १७ टन तांदूळ जप्त केला. या तांदळाची किंमत ४ लाख २० हजार रुपये आहे. तर वाहनाची किंमत २२ लाख आहे. पोलिसांनी २६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुरवठा विभागालाही याप्रकरणी कळवण्यात आले असून अहवाल मागितला आहे.
जिल्ह्यात कुंटूर फाट्यावर पोलिसांनी एका गोदामावर धाड टाकून मोठ्या प्रमाणात धान्य जप्त केले होते. या कारवाईत महिला व बालकल्याण विभागाच्या पोषण आहारही आढळला होता. त्यानंतर अर्धापूर येथे पोलिसांनी स्वस्त धान्यावर कारवाई करीत गुन्हे दाखल केले आहेत. १० सप्टेंबर रोजी देगलूर येथे देगलूर -उदगीर रस्त्यावर कारेगाव येथे एक ट्रक पकडून १ लाख २० हजार रुपयांचे गहू आणि तांदूळ जप्त करण्यात आले. तसेच २२ लाखांचा ट्रकही जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पुरवठा विभागाची स्वस्त धान्याच्या काळ्याबाजाराकडे डोळेझाकच..! नांदेड जिल्ह्यात रेशनच्या धान्याचा खुलेआम काळाबाजार सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. याकडे पुरवठा विभाग मात्र ‘अर्थपूर्ण’ डोळेझाक करीत असल्याचेच स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात पोलिसांनी गेल्या पंधरा दिवसात काळ्या बाजारात जाणाऱ्या स्वस्त धान्याचे सहा ट्रक पकडले आहेत. २५ ते ३० लाख रुपयांहून अधिक रकमेचे धान्य आणि जवळपास दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतरही पुरवठा विभागाने एकही कारवाई केली नाही हेही विशेष. नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्राचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या दोन-तीन बैठकातच कार्यक्षेत्रातील चारही पोलीस अधीक्षकांना जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक उमाप यांनी कालमर्यादाही निश्चित केली. त्यानंतर अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी विशेष पोलीस पथकांची स्थापना केली आहे. नांदेड जिल्ह्यातही पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ ची घोषणा करत कारवाईचा धडाका सुरू केला आहे. जिल्ह्यात सहा विशेष पथकामार्फत कारवाई सुरू आहे. तसेच ठाणेदारांनाही आपल्या हद्दीत काळे धंदे अवैध धंदे सुरू असल्यास आपल्याला जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून गुटखा, रेती, स्वस्त धान्य, नशेचे पदार्थ पकडून कारवाई केली जात आहे.