
नांदेड – नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक आगामी विधानसभेसोबत होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पक्षाकडे आपणही या पोटनिवडणुकीत उमेदवारीची मागणी करीत आहोत. याबाबत आज १६ सप्टेंबर रोजी नांदेडमध्ये नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण आणि भोकर विधानसभा मतदार संघातील पक्षाच्या मूळ, जमिनीवरच्या कार्यकर्त्याची मते जाणून घेतली. या कार्यक्रमात आपल्या उमेदवारीबाबत पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिली, तर आपण पूर्ण सक्षमतेने ही निवडणूक लढवू आणि पक्षाला ही जागा मिळवून देऊ, असा विश्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार राम पाटील रातोळीकर यांनी व्यक्त केला.
नांदेडमध्ये आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या निवासस्थानी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाची बैठक सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत माजी आमदार रातोळीकरांनी आपण आगामी लोकसभेची पोटनिवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले. पक्षाकडे आपण उमेदवारीसाठी मागणी करीत आहोत, याबाबत कार्यकर्त्यांना माहिती व्हावी यासाठीच ही बैठक घेण्यात येत आहे. त्याचवेळी उद्या १७ सप्टेंबर रोजी पालकमंत्री गिरीश महाजन हे नांदेडमध्ये येत आहेत. याबाबत त्यांच्याशीही आपण चर्चा करणार आहोत. पक्ष संघटनेत गेली २०-२२ वर्ष काम करताना पक्षाकडे उमेदवारी मागणे चुकीचे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे या बैठकीत कार्यकर्त्यांनीही आपली मते व्यक्त करताना रातोळीकरांच्या उमेदवारीला सकारात्मक पाठिंबा दिला. नांदेड महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी तर रातोळीकर यांचा भावी खासदार असा उल्लेख करत पक्षाने रातोळीकरांना उमेदवारी दिली तर आपण ताकदीने त्यांना निवडून आणू, असा विश्वासही व्यक्त केला. इतरही सर्वच पदाधिकाऱ्यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत खासदार चिखलीकर यांचा पराभव का झाला याबाबत रातोळीकर यांनी विरोधकांनी भाजपाची ४०० पार ची घोषणा ही संविधान बदलासाठी असल्याचे सांगत लोकांमध्ये संविधान बदलाबाबत संभ्रम निर्माण केला. त्याचवेळी मराठा आरक्षणाचा मुद्दाही नांदेडमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात होता. त्यामुळे पराभव पत्करावा लागला. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. प्रत्येक निवडणुकीत फेक नरेटिव्हचा लाभ मिळू शकणार नाही. त्यामुळे लोकसभा पोटनिवडणुकीसह भाजपाला विधानसभा निवडणुकीतही यश मिळवण्यात आता कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या बैठकीस प्रदेश कार्यकारणी सदस्य चैतन्य बापू देशमुख, अजय बिसेन, बाळू खोमणे, प्रताप पावडे, संतोष वर्मा, आशिष नेरलकर, डॉ. शितल भालके, श्रद्धा चव्हाण, महादेवी मठपती, साहेबराव गायकवाड, दिलीप ठाकूर, आनंद पावडे आदी प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
कोणाच्या जाण्या – येण्याने काही फरक पडत नाही… माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी भारतीय जनता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांच्या जाण्याने पक्षावर किती परिणाम होईल याबाबत विचारणा केली असता कोणाच्या जाण्या येण्याने काहीही परिणाम होत नसतो, असे रातोळीकर म्हणाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अशोकराव चव्हाण यांना आणि खासदार चिखलीकर यांना मिळालेल्या मतांची गोळा बेरीज केली तर ती मते १२ लाखांच्या पुढे जात होती. त्यामुळे २०२४ चा विजय गृहित धरला जात होता. मात्र लोकांनी वेगळा कौल दिला. त्यामुळे लोकांना आता गृहीत धरू नये, असा इशाराही देताना जनता हीच सर्वश्रेष्ठ आहे असे माजी आमदार रातोळीकर यांनी स्पष्ट केले.
लोकसभा पोटनिवडणुकीसाठी खतगावकरांना कोण ऑफर दिली ते त्यांनी स्पष्ट करावे…माजी खासदार भास्करराव पाटील यांनी भाजपातून काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेताना त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडून आपल्याला असलेल्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण होत नसल्यानेच आपण पक्ष सोडत आहोत हे सांगितलेच. त्याचवेळी लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाने आपल्याला उमेदवारीची ऑफर दिली होती. मात्र ती ऑफर आपण नाकारल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे भाजपासारख्या देशातील सर्वात मोठ्या पक्षाकडून आणि ज्या पक्षाचे नेतृत्व नरेंद्र मोदी करत आहेत, त्यांचे नेतृत्व भारतानेच नव्हे तर जगाने मान्य केले आहे. त्यामुळे अशा पक्षाकडून देण्यात येणारी उमेदवारी नाकारली असे खतगावकर सांगत आहेत. त्यामुळे खतगावकरांना पोटनिवडणुकीत उमेदवारीची ऑफर कोण दिली? का दिली? खरोखरच ऑफर दिली का? हे त्यांनी जाहीर करावे, त्याबाबत खुलासा करावा, अशी मागणी माजी आमदार रातोळीकर यांनी केली आहे. याबाबत आपण पक्षातील वरिष्ठांशीही चर्चा करणार आहोत. त्याचवेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी याच विषयावर आपण चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.