
नांदेड – देशातील तब्बल २३ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागलेल्या नीट परीक्षेतील घोटाळ्याप्रकरणी बिहार, गुजरातनंतर आता या घोटाळ्याचे धागेदोरे थेट लातूरपर्यंत पोहोचले आहेत. जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांविरुद्ध लातूरच्या शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेडच्या एटीएस पथकाने या दोन शिक्षकांना ताब्यात घेऊन त्यांची शनिवारी रात्रीपासून चौकशी सुरू केली होती. अखेर रविवारी सायंकाळी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या अर्थात (नीट) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे हे लातूरपर्यंत पोहोचले आहेत. नांदेड एटीएस पथकाने पेपरफुटी प्रकरणातील संशयावरून संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण या दोन शिक्षकांना शनिवारी सायंकाळी ताब्यात घेतले. हे दोघेही अनुक्रमे सोलापूर आणि लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून ते लातूरमध्ये खाजगी कोचिंग क्लासेस चालवतात. या माध्यमातूनच पेपरफुटी प्रकरणात या शिक्षकांचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय होता. नांदेडनंतर लातूरमध्ये नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मराठवाड्यात सर्वाधिक आहे. देशभरात २३ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा यांना दिली होती. महाराष्ट्रात २ लाख ७५ हजार विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली आहे. त्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जवळपास ४ हजार ९५० आणि खाजगी महाविद्यालयामध्ये ३ हजार जागा एमबीबीएससाठी आहेत. जवळपास ८ हजार विद्यार्थ्यांना एमबीबीएसला प्रवेश मिळेल.
नीटच्या पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत गुजरातमधील गोधरा, बिहारमधील पाटणा, झारखंड यासह उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथून संशयतांना अटक केली आहे. त्यांच्याकडून अनेक पुरावेही जप्त केले आहेत. यासह विद्यार्थ्यांनी गुजरातमधील गोधरा येथील एका परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी दिलेले धनादेशही जप्त करण्यात आले आहेत. जवळपास साडेबारा कोटी रुपयांचे हे धनादेश जप्त करण्यात आले आहेत. या केंद्रावर देशभरातील विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आले होते. हे विद्यार्थी आपल्या जवळचे परीक्षा केंद्र सोडून याच ठिकाणी का आले होते, याबाबतचा संशय बळावल्यानंतर कारवाईला वेग आला होता. नीट पेपरफुटी प्रकरणी गुजरात, पंजाब, हरियाणा आणि बिहार राज्यात तक्रारी दाखल झाल्या आहेत. गुन्हेही दाखल होत आहेत. याच अनुषंगाने आता महाराष्ट्रातही कारवाईचा श्रीगणेशा झाला आहे. लातूरमध्ये शनिवारी रात्री नांदेडच्या एटीएस पथकाने कारवाई करताना जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखा पठाण या दोन शिक्षकांचा समावेश आहे. या दोन शिक्षकांची शनिवारी रात्री चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना सकाळी सोडून देण्यात आले होते. मात्र पुन्हा एटीएसने या दोघांना ताब्यात घेत त्यांची चौकशी रविवारीही सुरू ठेवली. अखेर चौकशीनंतर या दोघांविरुद्ध लातूरच्या शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलीसच करतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता देशभरातील या नीट प्रकरणातील पेपरफुटीचे धागेद्वारे लातूरपर्यंत पोहोचले आहेत. आगामी कारवाईकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.