
नांदेड – नांदेड महापालिकेने आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी घोषित केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर १३९ आक्षेप प्राप्त झाले आहेत. सोमवारी शेवटच्या दिवशी ११७ आक्षेप दाखल करण्यात आले असून यामध्ये सर्वाधिक आक्षेप हे प्रभाग क्रमांक आठ शिवाजीनगर आणि नवामोंढा या क्रमांक ९ च्या प्रभाग रचनेवर प्राप्त झाल्याची माहिती पुढे आली आहे. या सर्व आक्षेपावर आता जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे १६ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीत सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे या सर्व निवडणूक धामधुमीत आता राज्य शासनाने नांदेड महापालिकेतील निवडणूक विभागाच्या उपायुक्त सुप्रिया टवलारे यांची बदली केली आहे. त्यांना आजच सोमवारी नांदेड महापालिकेतून रिलीव्हही करण्यात आले आहे. त्यामुळे आता आगामी काळात निवडणुकीचा पदभार नेमका कोणत्या उपायुक्तांना सोपवला जाईल याकडे लक्ष लागले आहे.
नांदेड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेत महापालिका निवडणुकीसाठी २० प्रभाग राहतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. या वीस प्रभागात ८१ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. नांदेड महापालिकेअंतर्गत चार सदस्यांचे १९ प्रभाग राहणार आहेत. एका प्रभागात पाच सदस्य राहतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिकेने ३ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या या अधिसूचनेवर १५ सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना मागवल्या होत्या. त्यानुसार नांदेड महापालिकेकडे १५ सप्टेंबरपर्यंत एकूण १३९ हरकती, सूचना प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये शेवटच्या दिवशी तब्बल ११७ आक्षेप दाखल करण्यात आले आहेत. या आक्षेपावरील सुनावणी आता जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे होणार आहे. ही सुनावणी १६ ते २२ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. नांदेड महापालिकेच्या निवडणूक विभागाच्या उपायुक्त सुप्रिया टवलारे यांची अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी बदली झाली आहे. त्यांना १५ सप्टेंबर रोजी नांदेड महापालिकेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे.
आक्षेपाचा केंद्रबिंदू शिवाजीनगर आणि नवा मोंढा प्रभाग… महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर सर्वाधिक आक्षेप शिवाजीनगर आणि नवा मोंढा या प्रभाग रचनेवर दाखल झाले आहेत. मूळ प्रभाग तोडून काही पक्षांना सोयीचा ठरेल अशी प्रभागाची रचना करण्यात आल्याचे आक्षेप घेण्यात आले आहेत. त्याचवेळी राज्य महामार्ग तसेच इतर काही निकषांचेही उल्लंघन या प्रभागाच्या रचनेमध्ये केल्याचेही नमूद करण्यात आले आहे. काही आक्षेपामध्ये प्रभागांची नावे बदलण्याची सूचनाही करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्राप्त झालेल्या आक्षेपावर आता काय तोडगा निघतो, काय बदल होतात याकडेही लक्ष लागले आहे.



