महापालिका

नांदेड महापालिकेत खा. अशोकराव चव्हाणांचा राबता वाढला..!

प्रलंबित विकासकामांची मॅरेथॉन आढावा बैठक, निश्चित कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे आदेश

नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित विकासकामे जलदगतीने पूर्ण व्हावीत आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा तात्काळ निपटारा व्हावा, यासाठी माजी मुख्यमंत्री, खासदार अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी नांदेड महापालिकेत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आणि वाहतूक कोंडी यांसारख्या विविध ज्वलंत मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली व अधिकाऱ्यांना कडक निर्देश देण्यात आले.

महापालिकेत झालेल्या या बैठकीला महापौर कविता मुळे,  आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, आ.अमरनाथ राजुरकर स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, महिला बाल कल्याण सभापती सदिच्छा सोनी, माजी सभापती किशोर स्वामी यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी, अभियंता, विविध प्रभागातील नगरसेवक, भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि शहरातील विविध भागांतून आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी थेट खा.अशोकराव चव्हाण यांच्यापुढे आपल्या भागातील समस्या मांडल्या.

या बैठकीत प्रामुख्याने बोरबन भागातील मोकळ्या जागेत उद्यान विकसित करणे, तारासिंग मार्केट मधील रस्ता, जंगमवाडी व वजिराबाद मधुन जाणारा डी.पी.रस्ता, आसरानगर नागरी वस्तीवरील आरक्षण रद्द करणे, आसरानगर पाण्याची पाईप लाईन, तरोडा (खु) भागातील प्रस्तावित गॅस स्टेशन, असदवन येथील मुख्य रस्ता, नदिम कॉलनी गाडेगाव रस्ता व इंदिरानगर ते शोभा नगर येथील मनपाच्या जागेवरील अतिक्रमित जागा मोकळी करणे या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करुन सदरील कामे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश खा.चव्हाण यांनी दिले आहेत. बैठकीदरम्यान विविध प्रभागांतील नगरसेवकांनी आपापल्या भागातील प्रलंबित विकासकामांची माहिती खा.चव्हाण यांच्याकडे सादर केली. नागरिकांनी देखील प्रभागातील प्रलंबित रस्ते, ड्रेनेज लाईन, पथदिवे आणि कचरा संकलनाबाबतच्या तक्रारी थेट मांडल्या. या सर्व समस्यांवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागेवरच उत्तर देऊन निश्चित कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

“नांदेडकरांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणे हे आमचे कर्तव्य आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांचे जाळे, पाणी आणि मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी मिळून काम केले पाहिजे. कामात दिरंगाई करणाऱ्या किंवा निष्काळजीपणा दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. सर्व प्रलंबित प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना दिलासा मिळाला पाहिजे यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा राहणार असल्याचे खा. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!