महापालिका

नांदेड महापालिकेच्या विशेष मोहिमेत तीन दिवसात एक कोटींची कर वसुली, आज शास्ती माफीचा अखेरचा दिवस

थकीत पाणी करावरील शास्तीमध्ये दिली जात आहे ८० टक्के सूट

नांदेड :- महानगरपालिकेचे उत्पन्न वाढावे व थकीत कर वसुली करण्याच्या दृष्टीकोनातून मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी साल सन २०२४-२५ मधील पाणीपट्टी कर थकबाकीवरील शास्तीत ८० टक्के  सूट देण्याची घोषणा केली आहे. या योजनेस नांदेडकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला.  ८ ते १० ऑक्टोबर २०२४ या तीन दिवसामध्ये विशेष शिबिरात तब्बल एक कोटी रुपयांची पाणीकर वसुली झाली आहे. ११ ऑक्टोबर हा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटचा दिवस आहे.
नांदेड महानगरपालिकेने सालसन २०२४-२५ मध्ये १०० मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीचे उदिष्ट ठेवले असुन त्याअनुषंगाने वसुलीस सुरुवात करण्यात आलेली आहे. याचाच भाग म्हणुन दिनांक ८ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या ४ दिवसांच्या विशेष शिबिरामध्ये जे मालमत्ताधारक आपल्या पाणीपट्टी कराचा थकबाकीसह साल सन २०२४-२५ चा पूर्ण कराचा भरणा करतील त्यांना पाणीपट्टी थकबाकीवरील शास्तीमध्ये चार दिवसांसाठी ८० टक्के सूट देण्यात आली आहे. या योजनेस नांदेडकरांचा भरभरुन प्रतिसाद लाभलेला आहे.
मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे  यांच्या सुक्ष्म नियोजना आधारे व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाने या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार करण्यात आला होता. ज्यामध्ये या योजनेसंबंधी शहरात सर्वत्र बॅनर लावण्यात आले होते. आकाशवाणीच्या माध्यमातूनही योजनेबाबत प्रसिध्दी करण्यात आली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच घंटागाडी व इतर वाहनांवर या योजनेची प्रसिध्दी करण्यात आली होती.
महापालिकेकडे एकूण ६४ हजार ३८६ मालमत्ता धारकांची नोंदणी आहे. त्यापैकी ४० हजार ५२१ मालमत्ता धारकांवर पाणीपट्टी शास्ती थकीत होती. या विशेष शिबिरामध्ये त्यापैकी एकूण ८०९ मालमत्ता धारकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपली थकीत पाणीपट्टीचा भरणा करुन कर निरंक केला आहे. तीन दिवसात एक कोटींची कर वसुली झाली आहे. या चार दिवसांच्या विशेष शिबिराचे आयोजन मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या संकल्पनेतुन करण्यात आले होते. सदरील चार दिवसीय शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी व त्यांच्या अधिनस्त असलेल्या वसुली कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

११ ऑक्टोबर हा या योजनेचा शेवटचा दिवस आहे महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी या शास्तीमाफी योजनेचा लाभ घेऊन विशेष शिबिरामध्ये आपल्या थकीत पाणी कराचा भरणा करुन महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन कर विभागाचे उपायुक्त स.अजितपालसिंघ संधू यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!