राजकीय

प्रतापराव पाटील चिखलीकर यांना एक मत म्हणजे मोदींना मत – देवेंद्र फडणवीस

भव्य शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी दाखल, प्रतापरावांच्या रेकॉर्डब्रेक विजयाचा अशोकरावांचा दावा

नांदेड – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात भारताची अर्थव्यवस्था अतिशय वेगाने विकसीत होत आहे. येत्या काळात भारत ही जगातील तिसरी आर्थिक महाशक्ती व्हावी, हे नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे.  नांदेडमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकरांना एक मत म्हणजे मोदींना मत आहे. नांदेडमधील भारतीय जनता पार्टी महायुतीच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह, जल्लोष आणि नवचैतन्य पाहता खा.चिखलीकर यांच्या रुपाने नांदेडमधील विजय हा अभूतपूर्व असेल, असा विश्‍वास  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नांदेड लोकसभेचे उमेदवार खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला संबोधीत करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्याने खा.चिखलीकरांचे मताधिक्य  वाढणार आहे. कोणतीही अपेक्षा न बाळगता चव्हाण यांनी केवळ मराठवाडा व विदर्भाच्या विकासासाठी भाजपात प्रवेश केला. आपण समृद्धी महामार्गाची संकल्पना ज्यावेळी मांडली, त्यावेळी विरोधी पक्षांचा विरोध असतानाही अशोकराव चव्हाण यांनी समर्थन दिले आणि आता नांदेडही समृद्धी महामार्गाला जाडतो आहे. विकासप्रश्‍नी राजकारण नको, अशी त्यांची भूमिका असते, असेही फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले, मोदी गॅरंटी म्हणजे जनकल्याणाचा अजेंडा आहे.  विविध योजनांच्या माध्यमातून मोदींनी देशातील २५ कोटी गरीबांना गरिबीतून बाहेर काढले. केवळ मुठभर लोकांसाठी त्यांनी काम केले नाही. ११ कोटी शौचालये बांधली, देशातील २० कोटी बेघारांना हक्काची पक्की घरे दिली.  देशातील ५० कोटी लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी, वीज, महिलांना गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले. कोविडच्या काळात जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडली, परंतु भारताची अर्थव्यवस्था तात्काळ सुधारली आहे.  सूर्यघर योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात एक कोटी लोकांना सौर उर्जेची उपकरणे दिली जाणार असून त्याद्वारे ३०० युनिट वीज मोफत दिली जाणार आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना दिवसा १२ तास अखंडीत वीज देण्याची योजनाही सुरु करण्यात आली आहे. भाजपा हा सर्व समाजाच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले.

आपल्या प्रास्ताविकपर भाषणात उमेदवार खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मागील पाच वर्षांत रेल्वे, महामार्ग तसेच जनतेचे विविध प्रश्‍न सोडिविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याचे सांगितले. कोरोना काळात दोन वर्षे निधी मिळालेला नसतानाही जिल्ह्यात अडीच लाख अन्नधान्यांचे कीट्स वाटप करून संकटात सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी प्रयत्न केले. मागील २५-३० वर्षांतील प्रलंबित रेल्वेविषयक प्रश्‍न मार्गी लावल्याचे सांगून त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवश्यक ते सहकार्य केल्याचे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सहकार्यामुळेच वंदेमातरम् एक्सप्रेस नांदेडपर्यंत येणार असल्याची माहितीही खा.चिखलीकर यांनी दिली. जिल्ह्याला आता पाच खासदार लाभणार असून नांदेडच्या विकासाची चिंता करायची गरज नाही.खा.अशोकराव चव्हाण आता आपल्यासोबत आहेेत, माझा विजय निश्‍चित असून प्रचंड मताधिक्य नांदेडची जनता देईल, असा विश्‍वासही खा.चिखलीकरांनी व्यक्त केला. यावेळी विरोधकांकडून होत असलेल्या टिकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मागील निवडणुकीप्रमाणेच यावेळीही नांदेडची जनता खा.प्रतापराव चिखलीकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा विश्‍वास व्यक्त केला. मागील पाच वर्षांत खा. चिखलीकर यांनी केंद्रातील व राज्यातील विविध मंत्रालयात वारंवार भेटी देवून नांदेडच्या विकासासाठी निधी खेचून आणल्याचे त्यांनी सांगितले. सर्वाधिक प्रवास करणारा खासदार म्हणजे खा.चिखलीकर यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल.खा.चिखलीकरांना एक मत म्हणजे मोदींना मत, देशाच्या विकासाला मत आहे. खा.अशोकराव चव्हाण यांच्यामुळे जिल्ह्यातील भाजपची ताकद वाढली आहे. त्यांना प्रचंड मताधिक्य मिळेल, असा विश्‍वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.

व्यासपीठावर ना.भागवत कराड, ना.अतुल सावे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, सहकार मंत्री अतुल सावे, खा.अजित गोपछडे, खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांताताई पाटील, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर, विभागीय संघटनमंत्री संजयभाऊ कौडगे,आ. राम पाटील रातोळीकर, आ.डॉ.तुषार राठोड, आ. राजेश पवार, आ. बालाजीराव कल्याणकर, आ. भीमराव केराम, माजी आ. सुभाषराव साबणे, माजी आ. अमरनाथ राजूरकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ. अविनाश घाटे, प्रदेश सचिव देविदास राठोड, शिवसेना संपर्क प्रमुख आनंदराव जाधव, महाराष्ट्र संघटक (आठवले गट) विजय सोनवणे, लोकसभा निवडणूक प्रमुख व्यंकटराव पाटील गोजेगावकर, रा.काँ.पा.चे प्रदेश सचिव भाऊसाहेब देशमुख गोरठेकर, हरिहरराव भोसीकर, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे, रा.काँ.चे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, भाजपा नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.किशोर देशमुख, महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव बोंढारकर,उमेशराव मुंडे, गंगाधरराव बडूरे, रा.काँ.चे जिल्हाध्यक्ष (उत्तर) विश्‍वांभर पवार, जिल्हाध्यक्ष (आठवले गट) गौतम काळे, रा.काँ.चे शहराथ्क्ष जीवनराव घोगरे, प्रविण पाटील चिखलीकर, प्रणिताताई देवरे-चिखलीकर,मंगाराणी अंबुलगेकर, प्रविण साले,चैतन्य बापू देशमुख, अ‍ॅड. दिलीप ठाकूर, बाळू खोमणे,श्रावण पाटील भिलवंडे, ओमप्रकाश तापडिया, अरविंद भारतीया, बालाजी बच्चेवार, उमरी कृउबाचे सभापती शिरीष देशमुख गोरठेकर, मारोतराव कवळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गोविंदराव शिंदे नागेलीकर, सुरेश अंबुलगेकर यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तत्पूर्वी सकाळी जुना मोंढा येथून भव्य रॅली काढण्यात आली. प्रचंड जयघोष, वाद्यांचा निनाद आणि फटाक्यांच्या आतषबाजीत निघालेल्या या रॅलीत जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला भगिनी व मतदार बंधू-भगिनी उपस्थित होत्या. रॅलीनंतर खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. रॅलीचे रुपांतर हिंगोली गेट जवळील गुरुद्वारा मैदानावर प्रचंड जाहीर सभेत झाले.

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनीही आपल्या तडाखेबंद भाषणात टिकाकारांचा  समाचार घेतला. २००९ मध्ये नाना पटोले यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला, हे ते विसरले असतील, परंतु बस्वराज पाटील, अर्चना पाटील, संजय निरुपम हे काँग्रेस सोडून का जात आहेत,याचे उत्तर त्यांच्याकडे नाही, एकाधिकारशाही जास्त दिवस चालत नाही, अशी कोपरखळी त्यांनी नाना पटोले यांना मारली. विकसीत देश, विकसीत महाराष्ट्र, विकसीत मराठवाडा आणि विकसीत विदर्भ हे सर्व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच घडून आले.आपण केवळ विकासाच्या मुद्यावर भाजपात प्रवेश केला, आता जिल्ह्यात प्रचंड एकोपा निर्माण झाला आहे. दररोज पक्ष प्रवेश सुरु आहे. येत्या काळात पाच खासदारांची वज्रमुठ राहणार आहे. येत्या ४ जून रोजी लागणारा लोकसभेचा निकाल हा खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या बाजूनेच व प्रचंड मताधिक्याने लागणार आहे.आचारसंहिता संपताच महाराष्ट्रातील अऩेक प्रश्‍न घेऊन आम्ही सर्वजण दिल्लीत जाऊ, विकासाचा अजेंडा तयार आहे. अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा असो, कुरुंदकर स्मारक असो, भोकर येथील सेवालाल महाराजांचा पुतळा आदी सर्व प्रश्‍न मार्गी लागले आहेत. कोणालाही गॅरंटी देता येत नाही, गॅरंटी देण्यासाठी तेवढ्याच उंचीचा माणूस असाा लागतो.मोदी गॅरंटी म्हणजे काही साधीसुधी गॅरंटी नाही. या निवडणुकीत खा.प्रतापराव चिखलीकरांचा विजय म्हणजे रेकॉर्डब्रेक विजय असेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!