प्रशासकीय

निवडणूक संपली, आता कामाला लागा…

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मागवला प्रलंबित प्रकरणांचा अहवाल

नांदेड – नांदेड लोकसभा निवडणुकीच्या कामात महसूलसह इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी जवळपास ७५ दिवसांहून अधिक काळ व्यस्त होते. २६ एप्रिल रोजी नांदेड आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले आहे. त्यामुळे आता विविध विभागाचे प्रलंबित राहिलेले प्रकरणे निश्चित करून ते कालबध्दरित्या ३१ मे पर्यंत निकाली काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात नांदेड, हिंगोली आणि लातूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या कामामुळे प्रत्येक कार्यालयाच्या स्तरावरील अनेक कामे प्रलंबित राहिल्याची शक्यता आहे. नांदेड आणि हिंगोली लोकसभा मतदार संघाची निवडणूक पार पडली आहे, मतदान झाले आहे. मात्र आता लातूर मतदार संघातील मतदान हे ७ मे रोजी होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या कामामुळे प्रलंबित राहिलेली कामे कालबद्धरित्या निकाली काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.

निवडणुकांच्या कामकाजामुळे त्या त्या कार्यालयातील ३० एप्रिल अखेरपर्यंत प्रलंबित प्रकरणांची यादी ३ मे पर्यंत एका विवरण प्रत्रात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुसरीकडे लोहा आणि कंधार तालुक्यात लातूर लोकसभा मतदारसंघाचे काम सुरू आहे. येथे ७ मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे या दोन तालुक्यांना प्रलंबित कामांची यादी मतदानानंतर १० मे अखेरपर्यंत तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सोपविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  त्याचवेळी विविध विभागांकडे  प्रलंबित असलेली कामे ३१ मे पर्यंत निकाली काढून त्याचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे आता निवडणूक संपली कामाला लागा असाच संदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कार्यासन अधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना एका परिपत्रकाद्वारे प्रलंबित कामांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. ही प्रलंबित कामे कर्मचारी निहाय तसेच विभागनिहाय निश्चित करून ती कालबध्दरित्या ३१ मे पर्यंत निकाली काढायचे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!