
नांदेड – नांदेडहून मुंबई तसेच विदर्भ खान्देशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने आणखी एक खुश खबर दिली आहे. विदर्भ खान्देशमार्गे मुंबईसाठी आठवड्यातून दोन दिवस ही गाडी धावणार आहे. यामुळे मुंबईसाठी एक अतिरिक्त गाडी मिळत असतानाच या रेल्वेमुळे नांदेडसह मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांची विदर्भ आणि खान्देशाची कनेक्टिव्हीटी वाढणार आहे. यासंदर्भात माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा होता.
आठवड्यातून दोन दिवस चालणारी ही गाडी सोमवार व बुधवारी नांदेडहून निघेल व मंगळवार व गुरुवारी तिचा परतीचा प्रवास लोकमान्य टिळक टर्मिनन्स ते नांदेड असा असेल. रात्री 9.15 मिनिटानी नांदेड येथून निघणारी ही रेल्वे गाडी पूर्णा-वसमत-हिंगोली-वाशिम-अकोला-मनमाड-नाशिक-कल्याण मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनन्सवर दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजता पोहचेल. त्यानंतर सायंकाळी तिचा परतीचा प्रवास सुरु होऊन मंगळवार व गुरुवारी दुपारी ती नांदेडला पोहचेल.
काही दिवसांपूर्वी ही गाडी सुरू करण्यात आली होती. परंतु काही कारणांमुळे ही रेल्वे सेवा खंडित झाली. यासंदर्भात माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा करून ही गाडी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या पाठपुराव्यास रेल्वे मंत्र्याकडून हिरवा कंदिल मिळाला असून मे महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात या गाडीचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नांदेड येथे होणार आहे. या रेल्वेमुळे नांदेडसह परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील प्रवाशांना श्रीक्षेत्र शेगाव यासह मध्यप्रदेशात जाण्यासाठी फायदेशीर राहणार आहे.



