नांदेड – शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाई निवारणासाठी महापालिकेने आता तातडीच्या उपायोजना हाती घेतल्या आहेत. या अंतर्गत शहरामध्ये विविध भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात असून ईसापूर प्रकल्पातून आसना नदीवरील सांगवी बंधाऱ्यात पाणी आणण्यात येणार आहे. हे पाणी शनिवारी संध्याकाळपर्यंत उपलब्ध होईल. त्याद्वारे उत्तर नांदेडला सोमवारपासून पाणीपुरवठा करणे शक्य होईल अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिली.
विष्णुपुरी येथील कोटतीर्थ पंपगृहात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे उत्तर नांदेड शहराचा पाणीपुरवठा शुक्रवारपासून खंडित झाला आहे. या तांत्रिक बिघाडातील दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर महापालिका पाणीपुरवठा विभागाने हाती घेतले आहे. परंतु हे काम होण्यास अजूनही चार ते पाच दिवसाचा अवधी लागण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नांदेडकरांना आता आसना नदीवरील सांगवी बंधाऱ्यातील पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी देण्याचा निर्णय आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी घेतला आहे. ईसापूर धरणातील पाणी आसना नदीवरील सांगवी बंधाऱ्यात सोडण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिण्यात आले. यावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तातडीने निर्णय घेताना ईसापूर प्रकल्पातून पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळीच नांदेडच्या दिशेने पाणी निघाले आहे. हे पाणी शनिवारी सायंकाळी सांगवी बंधाऱ्यात पोहोचेल. तेथून हे पाणी काबरानगर येथील पंप हाउसद्वारे शहरातील विविध जलकुंभात दिले जाईल आणि त्याद्वारे नळाला पाणीपुरवठा होईल. उत्तर नांदेडात सोमवारी पाणीपुरवठा केला जाईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान शहरातील महापालिकेच्या मालकीच्या बोअरही पाणीपुरवठासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहरात महापालिकेच्या ४३ बोअर असून यापैकी ३५ बोअरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. महापालिकेने टँकरनेही पाणीपुरवठा सुरू केला आहे. जवळपास २० ते २२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांनी टँकरच्या मागणीसाठी उपअभियंता बोधनकर ( ९०११०००९५६) आणि ठाकूर (९६२३४६९९८४) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.