महापालिका

नांदेडकरांना पाण्यासाठी आणखी प्रतीक्षाच करावी लागणार..!

ईसापूरचे पाणी रविवारी दुपारनंतर पोहोचणार 

नांदेड – शहरात २ मे पासून पाणीपुरवठा ठप्प झाल्यानंतर पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारे शहरवासियांना सोमवारी पाणी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र आता सोमवार ऐवजी मंगळवारी उत्तर नांदेड वासियांना पाणी मिळेल अशी शक्यता आहे. इसापूर धरणातून वाढत्या तापमानामुळे पाणी आणण्यात येणाऱ्या अडचणी पाहता नांदेडकरांना पाण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

महाराष्ट्र दिनी मध्यरात्री विष्णुपुरी प्रकल्पावरील कोटीतीर्थ पंप हाऊस येथे झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे उत्तर नांदेड शहरातील पाणीपुरवठा २ मे पासून खंडित झाला आहे. हा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पर्यायी पाणी पुरवठ्यासाठी ईसापूर धरणातून पाणी मागवण्याचा महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी तातडीने निर्णय घेतला. जिल्हाधिकाऱ्यांकडे पाणी सोडण्याबाबत पत्र दिले. या पत्रावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तातडीने कार्यवाही करताना ईसापूर धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले. ईसापूर धरणातून गुरुवारीच सोडलेले पाणी नांदेडमध्ये आसना नदीवरील सांगवी बंधाऱ्यात शनिवारी येईल अशी अपेक्षा होती. मात्र हे पाणी आणण्यात वाढत्या तापमानामुळे अनेक अडचणी येत आहेत. हे अडथळे दूर सारून पाणी आणले जात आहे. रविवारी दुपारनंतर सांगवी बंधाऱ्यात ईसापूर धरणाचे पाणी पोहोचेल. त्यानंतर पुढील काही तासात पाणी शुद्धीकरणानंतर ते शहरवासियांना पुरवता येणार आहे. त्यामुळे शहराला सोमवारऐवजी मंगळवारी पाणीपुरवठा होईल, अशी शक्यता महापालिका सूत्रांनी वर्तवली आहे.

दरम्यान, शहरातील पाणीटंचाईचे हे संकट पाहता खाजगी टँकरचालकांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांची लूट सुरू केली आहे. काही राजकीय नेत्यांनी मोफत पाणी टँकर सुरू केले असले तरीही ते उत्तर नांदेडला कमीच पडत आहेत. नांदेड महापालिकेनेही जवळपास २० ते २२ टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. ५ हजार लिटर पाण्याचे टँकर हे पाच हजार रुपयांना मिळत आहे. अधिक किंमतीतील हे टँकर घेण्यासाठीही नागरिकांची धावपळ सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात निर्माण झालेल्या या पाणी संकटामुळे उत्तर नांदेडकर मात्र संतप्त झाले आहेत. सोशल मीडियावरही महापालिकेच्या नावे शंख केला जात आहे.

इसापूरचे पाणी पोहोचले पार्डीपर्यंत…ईसापूर धरणातून नांदेडसाठी सोडण्यात आलेले दोन दलघमी पाणी आता अर्धापूर तालुक्यातील पार्डीपर्यंत कॅनॉलमार्गे पोहोचले आहे. पुढे आसना नदीतील सांगवी बंधाऱ्यापर्यंत पाणी आणण्यासाठी नदीपात्राचा वापर करावा लागणार आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे ईसापूर धरणातून सोडलेल्या दोन दलघमी पाण्यापैकी किती पाणी सांगवी बंधाऱ्यापर्यंत पोहोचेल हा प्रश्नही उद्भवला आहे. पण त्याचवेळी ईसापूर प्रकल्पातून पाणी उचलणे सुरूच राहील असेही महापालिका पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पाण्याची कोणतीही कमतरता भासणार नाही हेही निश्चित.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!