
नांदेड – मुदखेडहून मारतळ्याकडे जात असलेली एक जीप क्रुझर येळी – महाटी पुलावरून थेट गोदावरी नदीत पडल्याने गाडीतील दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिखाची वाडी येथील उद्धव आनंदराव खानसोळे यांची एम. एच. २६ बी क्यू २०६१ क्रमांकाची क्रुझर जीप भाड्याने चालते. शुक्रवारीही एक खाजगी भाडे झाल्यानंतर सोबत असलेला आपला मित्र बबलू मारुती ढगे यांना सोडण्यासाठी उद्धव खानसोळे हा युवक क्रुझर जीप घेऊन शुक्रवारी सायंकाळी मुदखेडकडून मारतळ्याकडे जात होते. यावेळी येळी महाटी पुलावर ही जीप आली असता जीपचे अचानक पुढचे टायर फुटले. त्यामुळे चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले आणि जीप थेट गोदावरी नदीत कोसळली. ही बाब काही नागरिकांना समजताच मुदखेड पोलिसांना घटनेबाबत कळविण्यात आले. त्यावेळी मुदखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नांदेड महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक ही घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जीप आणि दोन मृतदेह गोदावरी नदीतून बाहेर काढण्यात आले. या घटनेत थोराजी उर्फ बबलू मारुती ढगे (वय २५ रा. येळी) आणि उद्धव आनंदराव खानसोळे वय ३०, रा.शिखाची वाडी) हे दोघे तरुण ठार झाले. याप्रकरणी मुदखेड ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.