प्रशासकीय

…अन् पंतप्रधानांच्या सूचनेनंतर झाला ‘जेएनएनयुआरएम’ अंतर्गत नांदेडचा देशभरातील ६५ शहरांमध्ये समावेश 

बदललेले नांदेड पाहून डॉ. मनमोहन सिंग म्हणाले होते, मैं विश्वास नही कर सकता... इतना कुछ हो सकता है..!

नांदेड – नांदेडमध्ये २००८ मध्ये ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व असलेला गुरु ता गद्दी त्रिशताब्दी सोहळा पार पडला. या सोहळ्यानिम्मित झालेल्या नांदेड शहराच्या सर्वांगीण या सोहळ्याच्या विकासात तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा सिंहाचा वाटा राहिला. या सोहळ्याच्या माध्यमातून नांदेडला पायाभूत सुविधांचा विकास झाला. अगदी शेवटच्या क्षणी देशातील ६५ शहरांमध्ये नांदेडचा समावेश करण्याच्या सूचना, नांदेडमध्ये बीएसयुपी योजनेची अंमलबजावणी करण्याचे आणि पर्यायाने संपूर्ण नांदेडचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलण्याचे श्रेय तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचेच. या काळात नांदेड महापालिकेचे आयुक्त म्हणून काम केलेल्या डॉ. दीपक म्हैसकर यांनी मितभाषी असलेल्या विकासाची तसेच सामाजिक तळमळ असलेल्या पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या काही आठवणी सांगितल्या. २००६ मध्ये पूरग्रस्तांची संवाद साधल्यानंतर नांदेड शहरात पुढील काळात साथरोगांचा फैलाव होऊ नये यासाठी काळजी घ्या, असे सांगणारे पंतप्रधान सदैव आठवणीत राहतील असे भावपूर्ण शब्दात सांगितले.

शीख धर्मीयांमध्ये श्री हुजूर साहिब अबचलनगर, नांदेडला मोठे धार्मिक महत्त्व आहे. शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेडची ओळख आहे. जगभरातील भाविक नांदेड येथील ऐतिहासिक श्री सचखंड गुरुद्वाराच्या दर्शनासाठी येत असतात. याच गुरुद्वारात २००८ मध्ये गुरु-ता-गद्दी सोहळा पार पडला. या सोहळ्याला २००८ मध्ये मोठे धार्मिक महत्त्व होते. तीनशे वर्षापूर्वी ‘गुरू ग्रंथ साहिब’ हेच आता शीख धर्मियांचे गुरू म्हणून स्वीकारले. कोणतेही देहधारी गुरू आता राहणार नाहीत, हे स्पष्ट करण्यात आले. शीख धर्मियांचे दहावे गुरु श्री गुरु गोविंदसिंघजी हे शेवटचे देहधारी गुरू ठरले. त्यामुळे नांदेडला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. त्यात २००८ मध्ये होणाऱ्या त्रिशताब्दी गुरु ता गद्दी सोहळ्याला देशभरातून नव्हे तर जगभरातून भाविक येणार ही बाब लक्षात घेऊन नांदेडमध्ये तयारीला प्रारंभ झाला. जवळपास २००५-०६ मध्येच ही तयारी सुरू झाली. या धार्मिक सोहळ्याच्या दृष्टीने वेगवेगळे नियोजन करण्यात येत होते. नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी पुणे येथे राज्य शासनाकडे या संदर्भातील एक प्रेझेंटेशन सादर केले होते.

याच कालावधीत देशात जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियान अर्थात ‘जेएनएनयुआरएम’ ही योजना तत्कालीन यूपीए अर्थात आघाडी सरकारने हाती घेतली होती. या योजनेअंतर्गत प्रारंभी देशातील ६३ शहरांचा समावेश करण्यात आला होता. मात्र ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला गुरु ता गद्दी त्रिशताब्दी सोहळा २००८ मध्ये नांदेडमध्ये होणार असल्याची बाब तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निदर्शनास आली. ‘जेएनएनयुआरएम’ च्या काही निकषात नांदेड शहर बसत नसतानाही त्यांनी विशेष बाब म्हणून अगदी शेवटच्या क्षणी नांदेड शहराचा ‘जेएनएनयुआरएम’ योजनेमध्ये समावेश केला. या योजनेतील समावेशामुळे पुढे नांदेडच्या विकासाचे द्वार खुले झाले.

याच काळात नांदेडसाठी बीएसयुपी घरकुल योजना मंजूर करण्यात आली. ही योजनाही पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीच नांदेडसाठी मंजूर केली होती. या योजनेअंतर्गत २६ हजार घरे बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते. यातून शहरी झोपडपट्टी निर्मूलनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. ही योजना नांदेडमध्ये अतिशय प्रभावीपणे राबविण्यात आली. तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी नांदेडमध्ये विकासाची मंजूर झालेली ही कामे मोठ्या प्रभावीपणे आणि वेळेमध्ये पार पाडली. शहरी झोपडपट्टी निर्मूलनासाठी बीएसयुपी अंतर्गत झालेल्या नांदेड शहरातील कामांची नोंद राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली होती. राष्ट्रीय पातळीवरील पहिला पुरस्कार नांदेड शहराला प्राप्त झाला होता. त्याचवेळी जेएनएनयुआरएम या योजनेतील कामाच्या गतीबाबतही नांदेड शहराला राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले होते.

बीएसयुपी अंतर्गत नांदेड शहरामध्ये जवळपास १९ हजार घरांचे काम पूर्ण झाले होते. बीएसयूपी योजनेसाठी १ हजार कोटींचा निधी केंद्र सरकारने मंजूर केला होता. त्याचवेळी जेएनयुआरएम अंतर्गत अनेक रस्ते, ४ पुलांची कामे, पायाभूत सुविधांचा विकास, पाणीपुरवठा, जलशुद्धीकरण केंद्र, १८ जलकुंभ उभारणी, गोदावरी नदी परिसर विकास या कामांसह श्री हुजूर साहेब गुरुद्वारा परिसरातील विकास कामांचाही समावेश होता. गुरुद्वारा परिसरातील विकास कामे पूर्ण झाले. गुरुद्वारा परिसरातील अनेक निवासस्थाने अबचलनगर येथे हलविण्यात आले. यातून गुरुद्वारा परिसराचा मोठा विकास करण्यात आला होता.

तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे २००६ मध्ये पूर परिस्थितीनंतर नांदेडमध्ये आले होते. त्यांनी नांदेडमधील पूरग्रस्तांची भेट नांदेड महापालिकेच्या जुन्या इमारतीमध्ये घेतली होती. या इमारतीमध्ये त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. त्याचवेळी तत्कालीन आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना निघताना सांगितले, या पूर परिस्थितीनंतर शहरात कोणत्याही साथरोगांचा फैलाव होणार नाही, याबाबत काळजी घ्या. एका पंतप्रधानांकडून सामान्य नागरिकांची काळजी घेण्याचा हा सल्ला निश्चितच मोलाचा होता, असे तत्कालीन आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या आठवणी सांगताना स्पष्ट केले. पुढे योग्य ती खबरदारी घेत शहरात कोणत्याही साथरोगाचा फैलाव महापालिकेने होऊ दिला नाही, असेही त्यांनी सांगितले.

नांदेडच्या विकासासंदर्भात अनेक बैठका पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी घेतल्या होत्या. या बैठकामध्येही त्यांनी आवश्यक त्या वेगवेगळ्या सूचना केल्या. नांदेडच्या गुरु ता गद्दी त्रिशताब्दी सोहळ्याच्या विकास आराखडा मंजुरीसाठी एका विशेष समितीचेही गठन करण्यात आले होते. या समितीचे अध्यक्षपद तत्कालीन गृहमंत्री डॉ. शिवराज पाटील चाकूरकर यांच्याकडे होते. या समितीमध्ये तत्कालीन नियोजन आयोगाचे सदस्य मॉन्टेकसिंघ अहलुवालिया, अंबिका पाल आदी सदस्यांचा समावेश होता. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, नांदेडचे तत्कालीन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेडच्या विकासासाठी अनेक सूचना केल्या. नांदेडच्या सर्व विकास कामांमध्ये पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे निश्चितपणे योगदान होते. त्यांनी या सगळ्या कामांचा पाठपुरावा केला, आढावा घेतला. त्यातूनच नांदेड शहराचा कायापालट होऊ शकला, असेही डॉ. म्हैसेकर यांनी स्पष्ट केले. गुरु ता गद्दी त्रिशताब्दी सोहळ्यानिमित्त केवळ गुरुद्वारा परिसराचा विकास करून चालणार नाही. तर संपूर्ण नांदेड शहराचा विकास झाला पाहिजे, शहरात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी घेतली होती, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे २००८ मध्ये गुरु ता गद्दी सोहळ्यानिमित्त नांदेडला आले. नांदेडला आल्यानंतर त्यांनी श्री सचखंड गुरुद्वारा परिसराचा झालेला विकास पाहिला आणि ते आश्चर्यचकित झाले. गुरुद्वारा परिसरात पोहोचल्यानंतर गाडीतून उतरताच ते म्हणाले, मैं विश्वास नही कर, सकता इतना कुछ हो सकता हैं..! नांदेडमधील श्री सचखंड गुरुद्वारा परिसराचा अतिशय कमी वेळात झालेला हा विकास पाहून त्यांनी अतिशय आनंद व्यक्त केला होता. इतकेच नाही तर त्यांनी अमृतसरमध्ये हाती घेतलेल्या सुवर्ण मंदिर परिसरातील ‘गलियारा’ योजनेतील कामांच्या गतीची तुलना केली होती. गलियारा योजनेअंतर्गत सुवर्ण मंदिर परिसराचा विकास हव्या त्या गतीने होऊ शकला नव्हता. आजघडीला सुवर्णमंदिर परिसरातील विकासाचे संपूर्ण चित्र बदलले आहेच. परंतु त्यावेळी त्यांनी नांदेडच्या कमी वेळेतील विकासाला गौरविले होते, ही आठवणही तत्कालीन आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सांगितली. एकूणच नांदेडच्या विकासाला तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा परीस स्पर्श लाभला आणि नांदेडचा बदललेला आजचा चेहरा मोहरा आपण पाहू शकत आहोत. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर आज दिल्ली येथे अंत्यसंस्कार होत आहेत. त्यांना नांदेडकर मोठ्या जड अंत: करणाने निरोप देताना त्यांनी नांदेडच्या विकासासाठी दिलेल्या योगदानासाठी सदैव त्यांची आठवण काढत राहतील हेही निश्चित..!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!