
नांदेड – नांदेड महापालिकेने पर्यावरण दिनापासून सुरू केलेल्या हरित नांदेड अभियानांतर्गत आतापर्यंत शहरात दहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आल्याची माहिती आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी शुक्रवारी दिली. नांदेड शहरातील डंकीन भागात पाणीपुरवठा व मलनि:सारण विभागाच्या वतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. आगामी दोन महिन्यात शहरांमध्ये २५ हजार वृक्ष लागवड केली जाईल, असेही आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी स्पष्ट केले.
शुक्रवारी सकाळी डंकीन परिसरात असलेल्या मलशुद्धीकरण केंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास उपायुक्त कारभारी दिवेकर, कार्यकारी अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे , कार्यकारी अभियंता शिवाजी बाबरे, उपअभियंता प्रकाश कांबळे, सहाय्यक आयुक्त संजय जाधव, सहाय्यक आयुक्त रमेश चवरे, उपअभियंता सतीश ढवळे, उपअभियंता नरेंद्र सुजलेवार, वृक्षमित्र फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष मुगटकर, शारदा कन्स्ट्रक्शनचे प्रकल्प व्यवस्थापक व्ही. डी. चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना कार्यकारी अभियंता सुमंत पाटील यांनी डंकीन परिसराचा हा भाग वृक्षारोपणाच्या माध्यमातून आगामी काळात वृंदावन करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला. तर वृक्षमित्र फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष मुगटकर यांनी शहरात सुरू असलेल्या हरित नांदेड अभियानाची विस्तृतपणे माहिती दिली. या मोहिमेत अनेक स्वयंसेवी संघटना संस्था जोडल्या जात आहेत. शहरातील नागरिकांनीही या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. उपायुक्त कारभारी दिवेकर यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपअभियंता प्रकाश कांबळे यांनी केले.
नागरिकांनाही मनपसंत झाडे मिळणार…अध्यक्षीय समारोपात डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी शहराला हरित करण्यासाठी पर्यावरण दिनापासून हरित नांदेड हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाला चांगले यश येत आहे. आतापर्यंत शहरात दहा हजार झाडे लावण्यात आली आहेत. उर्वरित दोन महिन्यात २५ हजारांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महापालिकेच्या सर्व मालकीच्या जागा इमारतीमध्ये हे वृक्षारोपण करण्यात येणारच आहे, परंतु नागरिकांनीही आपल्या मोकळ्या जागेवर वृक्षारोपण करण्यासाठी महापालिकेकडे संपर्क साधावा. नागरिकांच्या पसंतीचे झाडे महापालिका लावून देईल. त्यामुळे शहरात पर्यावरणाचे संतुलन राखण्यात मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.