
नांदेड :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवअंतर्गत केंद्र शासनाकडुन “हर घर तिरंगा” ही मोहिम सुरु करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत महापालिकेच्या वतीने नवीन नांदेडातील हडको बसस्थानक ते तरोड्यापर्यंत काढलेल्या या रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला.
हर घर तिरंगा मोहिम लोकांना तिरंगा ध्वज घरी आणण्यासाठी आणि भारताच्या स्वातंत्र्याची ओळख म्हणून तो फडकवण्यासाठी प्रोत्साहित करते. लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करुन भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता निर्माण करते. रॅलीची सुरुवात शुक्रवारी हडको बस स्थानकापासून करण्यात आली. यावेळी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येऊन तिरंगा प्रतिज्ञेचे वाचन केले. उपस्थितांना अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी तिरंगा प्रतिज्ञा दिली. त्यांच्या हस्ते राष्ट्रध्वजास समर्पित मोटारसायकल रॅलीस हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. या ताफ्यामध्ये मनपा अधिकारी व कर्मचारी यांनी तिरंगा हातात घेऊन शहरातील विविध ठिकाणावरुन प्रभागनिहाय रॅलीचे मार्गक्रमण केले.
या रॅलीमध्ये शहरातील युवा स्वंयसेवक, विद्यार्थी, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वंयसेवी संस्था, बचत गट इत्यादींनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला होता. सदरील तिरंगा रॅली हडको बसस्थानकापासुन सुरू झाली शहरातील विविध ठिकाणावरुन प्रभागनिहाय मार्गक्रमण करुन कॅनॉल रोड चौक मार्गे साईबाबा मंदिर चैतन्य नगर येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्यासह उपआयुक्त कारभारी दिवेकर, स.अजितपालसिंघ संधू, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, शिवाजी बाबरे, वैद्यकीय आरोग्य अधिकरी डॉ.सुरेशसिंह बिसेन, नगररचनाकार पवार, शिक्षणधिकारी राजेश पातळे, अंतर्गत लेखापरीक्षक सुधीर इंगोले, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे, सहाय्यक आयुक्त मो. गुलाम सादेक, उद्यान अधिक्षक डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग, स्टेडीयम व्यवस्थापक रमेश चवरे, क्षेत्रिय अधिकारी रावण सोनसळे, संभाजी कास्टेवाड, अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे, उपअभियंता प्रकाश कांबळे, मनोहर दंडे यांच्यासह मनपा कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
नांदेड शहरात शनिवारी तिरंगा यात्रा…“हर घर तिरंगा” या अभियाना अंतर्गत १० ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता महापालिकेच्या वतीने “तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील यात्रा महात्मा ज्योतीबा फुले पुतळा आय.टी.आय.चौक ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत काढली जाईल. या तिरंगा यात्रेत नांदेड शहरातील सर्व नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी, शासकीय कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.