महापालिका

गुड न्यूज..! नांदेड महापालिकेच्या पाणीकर शास्ती माफी योजनेस ५ दिवसांची मुदतवाढ

चार दिवसात तब्बल २ कोटी ६ लाख रुपये पाणीपट्टीची वसुली, नांदेडकरांना आता १६ ऑक्टोबरपर्यंत योजनेचा घेता येणार लाभ

नांदेड : नांदेड महापालिकेने पाणीकर शास्ती माफी योजनेस ८ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान मिळालेला प्रतिसाद पाहता या योजनेला पाच दिवसांसाठी मुदतवाढ दिली आहे. आता १६ ऑक्टोबरपर्यंत नांदेडकरांना पाणी करावरील शास्ती माफी योजनेचा लाभ  घेता येणार आहे. पहिल्या टप्प्यातील चार दिवसांच्या कालावधीत नांदेड महापालिकेने २ कोटी ६ लाख रुपये पाणी करापोटी वसूल केले आहेत.
महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीकोनातून मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी महानगरपालिकेच्या सालसन २०२४-२५ मधील पाणीपट्टी कर थकबाकीवरील शास्तीत ८० टक्के भरघोस सूट देण्याची घोषणा केली होती. त्यास नांदेडकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. दिनांक ०८ ते ११ ऑक्टोबर २०२४ या चार दिवसामध्ये विशेष शिबिरात तब्बल २ कोटी ६ लाख रुपये पाणी करापोटी वसुली झाली आहे.
नांदेड महानगरपालिकेने सालसन २०२४-२५ मध्ये १०० टक्के मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीचे उदिष्ट ठेवले आहे. त्याअनुषंगाने वसुलीस सुरुवात करण्यात आलेली आहे. याचाच भाग म्हणुन दिनांक ०८ ते ११ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित ४ दिवसांच्या विशेष शिबिरामध्ये शेवटच्या दिवशी १ कोटी ६ लाख रुपये कोटी पाणीपट्टी वसूल करण्यात महापालिकेला यश आले आहे. या विशेष शिबिराचे आयोजन मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या संकल्पनेतुन करण्यात आले होते. सदरील चार दिवसीय शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी व त्यांच्या अधिनस्त असलेल्या वसुली कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
या योजनेस वाढता प्रतिसाद विचारात घेता मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी या विशेष पाणीपट्टी वसूली योजनेस मुदतवाढ देऊन दिनांक १२ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पाणीकराच्या मागणी बिलानुसार थकबाकी सह सन २०२४-२५ चा पूर्ण पाणीकराचा भरणा केल्यास थकीत पाणीपट्टीवरील शास्तीमध्ये ८० टक्के सूट योजनेस ५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी या शास्तीमाफी योजनेचा लाभ घेऊन विशेष शिबिरामध्ये आपल्या थकीत पाणीकराचा भरणा करुन महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन मनपा आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी केले आहे. यापुढे या योजनेस मुदतवाढ न देता थकीत मालमत्ता व पाणीकराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकावर जप्तीची व नळ खंडनाची कारवाई करण्याचा इशारा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम व कर विभागाचे उपायुक्त स. अजितपालसिंघ संधू यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!