धार्मिक

नांदेड जिल्ह्यात विघ्नहर्ता श्री गणरायाचे जल्लोषात स्वागत 

नांदेड शहरात १३९८ तर ग्रामीण भागात २१२२ सार्वजनिक गणेश मंडळांनी केली 'श्रीं'ची स्थापना

नांदेड – विघ्नहर्ता श्री गणरायाचे नांदेड जिल्ह्यात आज शनिवारी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. घरोघरी श्रींची स्थापना करण्यात आली असून श्रींच्या प्राणप्रतिष्ठेची लगबग रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सार्वजनिक मंडळाकडून ढोल ताशांच्या गजरात श्रींच्या मूर्ती आपल्या मंडळात विराजमान करण्यात आल्या. नांदेड शहरात १ हजार ३९८ तर ग्रामीण भागात २ हजार १२२ सार्वजनिक मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी दिली. गणेशोत्सव काळात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी पोलीस दलाच्या वतीने अनेक उपाययजना करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

श्री गणरायाच्या स्वागतासाठी भक्तांकडून शुक्रवारपासूनच खरेदीची लगबग सुरू होती. शुक्रवारीच पूजेच्या साहित्यासह सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ गजबजली होती. खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात भाविक बाजारपेठेत उतरले होते. त्यासोबतच शनिवारी सकाळपासूनच ‘श्रीं’च्या प्राणप्रतिष्ठेची लगबग सुरू होती. नांदेड शहरातील जुना मोंढा, गाडीपुरा, कौठा, वसरणी या भागात श्रींच्या मूर्ती खरेदीसाठी सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी दुपारपासून पोहोचले होते. या भागातून जिल्हाभरात श्री गणेशाच्या मूर्ती नेल्या जात होत्या. रात्री उशिरापर्यंत श्रींची मूर्ती खरेदी करून ती आपल्या सार्वजनिक मंडळाच्या स्थापनेसाठी नेल्या जात होत्या. वेगवेगळ्या वाहनाद्वारे या मूर्ती नेण्यात येत असताना ढोल ताशांचा गजरही भाविकांचा उत्साह वाढवित होता. गुलाल उधळीत श्रींचे स्वागत केले जात होते. यात तरुणाईसह बच्चे कंपनीचा उत्साह ओसंडून वाहत होता.

नांदेड शहरात १ हजार ३९८ सार्वजनिक मंडळांनी तर ग्रामीण भागात २ हजार १२२ मंडळांनी श्रींची स्थापना केली आहे. त्याबरोबरच घरोघरी भक्तांनी श्री गणेशाची स्थापना केली आहे. नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण यांनी आपल्या शिवाजीनगरस्थित निवासस्थानी तर माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपल्या वसंतनगरस्थित निवासस्थानी श्री गणेशाची मोठ्या उत्साहात प्राणप्रतिष्ठा केली आहे. यावेळी दोन्ही कुटुंबांच्या वतीने श्रींची विधिवत पूजा करण्यात आली.

नांदेड शहरासह जिल्हाभरात राहणार तगडा बंदोबस्त…सण, उत्सवाच्या कालावधीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस दलाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. यंदा श्री गणेशोत्सवासह ईद-ए-मिलादचा सण एकत्र आला आहे. या काळात परस्पर सौहार्द कायम रहावा, शांतता टिकवून रहावी यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. नांदेड जिल्हा पोलीस दलासह अतिरिक्त मनुष्यबळही जिल्ह्याला उपलब्ध झाले आहे. यामध्ये राज्य राखीव दलाची एक तुकडीही जिल्ह्यात बंदोबस्तासाठी राहणार आहे. दोन प्रशिक्षणार्थी उपाधीक्षक, ३० पोलीस उपनिरीक्षक, चार पोलीस निरीक्षक आणि १ हजार २०० गृहरक्षक दलाचे जवान या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. सामान्य नागरिकांनीही या काळात पोलीस दलाला सहकार्य करण्याचे आवाहन गुरव यांनी केले आहे. सार्वजनिक मंडळांनी आपल्या श्रींच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने केले आहे. त्याचवेळी सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी स्थानिक पोलीस ठाण्यातून आपल्या गणेश मंडळाची परवानगी घ्यावी, यासाठी पोलीस दलाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असेही अपर पोलीस अधीक्षक गुरव यांनी स्पष्ट केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!