
नांदेड – नांदेड तालुक्यातील नेरली येथे दूषित पाणीपुरवठ्यामुळे जवळपास साडेतीनशे नागरिकांना कॉलराची लागण झाली आहे. यामध्ये सहा जणांची प्रकृती गंभीर झाली होती. मात्र अथक वैद्यकीय परिश्रमानंतर त्यांची प्रकृतीही आता धोक्याबाहेर आली आहे. इतर रुग्णही बरे होत आहेत. मात्र त्याचवेळी जिल्ह्यातील आठ ग्राम पंचायतीमध्ये आजही पाणी शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडरच नसल्याची गंभीर बाबही पुढे आली आहे. महिनाभरापूर्वी अशा ग्रामपंचायतीची संख्या ३२ इतकी होती. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून पाणी शुद्धीकरणासाठी होत असलेला हलगर्जीपणा नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचेच नेरली येथील परिस्थितीवरून स्पष्ट झाले आहे. नेरली येथील ग्रामपंचायतीमध्ये ब्लिचिंग पावडर असले तरीही त्यामधील क्लोरीनचे प्रमाण हे नियमानुसार नसल्याचेही निदर्शनास आले आहे.
नेरली येथील घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी तातडीने नेरली येथे भेट दिली. त्याचवेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनीही गेल्या तीन दिवसापासून नेरली येथे तळ ठोकला आहे. जवळपास ५० अधिकारी, कर्मचारी येथे घरोघरी सर्वेक्षण करत आहेत. रुग्णांना आवश्यक ते मार्गदर्शन करून आवश्यकता भासल्यास पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करीत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी करणवाल यांनी तातडीने जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या.
नेरली येथे दूषित पाण्यामुळेच नागरिकांना कॉलराची लागण झाली आहे. गावातील पाणी सोडण्याच्या वॉल्वमधून दूषित पाणीपुरवठा झाल्याची बाबही स्पष्ट झाली आहे. नेरली पाणी सोडण्यासाठी असलेले वॉल्व हे थेट नालीमध्येच असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचवेळी नेरली येथील जलकुंभाच्या खाली असलेल्या वॉल्वचीही स्वच्छता गेल्या अनेक वर्षापासून केली नव्हती. त्यामुळे या ठिकाणावरूनच दूषित पाणी नळाला गेले आणि ते नागरिकांनी पिले. यातूनच त्यांना विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुदैवाने शुक्रवारी गावातील निम्म्या भागाला पाणीपुरवठा झाला होता. अर्ध्या गावाला पाणीपुरवठा झाला नव्हता. रविवारी हे वॉल्व दुरुस्तीचे काम ग्रामपंचायतीने हाती घेतले आहे. मात्र आता कॉलराची लागण झालेल्या नागरिकांना यातून बरे होण्यासाठी काही कालावधी निश्चितपणे लागणार आहे रविवारीही जिल्हा परिषदेच्या आरोग्य पथकाने ७१ ग्रामस्थांची तपासणी केली. त्यातील नऊ जणांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मात्र सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. संगीता देशमुख यांनी सांगितले. या साथीमध्ये ३० मुलांनाही लागण झाली होती. त्यांची प्रकृती आता पूर्णतः सुधारली आहे. नेरली ग्रामस्थांनी आता वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देशमुख म्हणाल्या. पाणी गाळून, उकळून प्यावे. जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावेत, लहान बालकांची काळजी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
नेरली येथील आरोग्य उपकेंद्रातही आता तातडीच्या उपचारासाठी पाच खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तातडीचे उपचार रुग्णावर गावातच केले जातील आणि आवश्यक असेल तर जिल्हा रुग्णालय तसेच शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात येईल. उपकेंद्रामध्ये आवश्यक तो औषधीसाठाही उपलब्ध करून देण्यात आला आहे. नेरली येथील ९४ रुग्णावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ८९ आणि नवोदय हॉस्पिटलमध्ये २७ रुग्ण दाखल आहेत.
जिल्ह्यात एकूण १ हजार ३१० ग्राम पंचायती आहेत. गावामध्ये शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी ग्राम पंचायतीकडून हलगर्जीपणा होत असल्याचेच निदर्शनास आले आहे. भर पावसाळ्यात गेल्या महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतीमध्ये ब्लिचिंग पावडर उपलब्ध नव्हते. याबाबत जिल्हा आरोग्य विभागाने संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे याबाबत सूचित केले होते. त्यानंतरही आजघडीला आठ ग्रामपंचायतीमध्ये ब्लिचिंग पावडर नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. त्यामुळे साथरोगाचा धोका कायमच असल्याचे स्पष्ट होत आहे.