क्राईम

नांदेडहून निघालेल्या राज्यराणी एक्सप्रेसमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; संतप्त प्रवाशांनी केले रेल्वे रोको आंदोलन

हदगाव तालुक्यातील निवघा येथील प्रवासी चोरट्यांच्या मारहाणीत जखमी, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

नांदेड – नांदेडहून निघालेल्या राज्यराणी एक्सप्रेसमध्ये चोरट्याने धुमाकूळ घातला. मनमाड ते नाशिक दरम्यान अनेक प्रवाशांना चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत लुबाडले आहे. या घटनेत काही प्रवासी जखमीही झाले आहेत. लुबाडल्यानंतर पळून गेलेल्या चोरट्यांना तात्काळ पकडावे, या मागण्यासाठी प्रवाशांनी काही काळ रोको आंदोलनही केले. या घटनेमुळे तब्बल दोन ते तीन तास राज्यराणी एक्सप्रेस खैरवाडी या स्थानकावर थांबवण्यात आली होती. त्यामुळे नांदेडहून मुंबईकडे निघालेल्या प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल झाले आहेत.

बुधवारी नांदेडहून रात्री दहा वाजेच्या सुमारास निघालेली राज्यराणी एक्सप्रेस आज सकाळी मनमाडहून नाशिककडे निघाली. त्यावेळी अचानक रेल्वेमध्ये प्रवाशांना धमकावणे आणि लुबाडण्याचा प्रकार सुरू झाला. प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुबाडण्यात येत होते. यावेळी काही प्रवाशांनी याचा प्रतिबंध केला असता त्यांना मारहाण करण्यात आली. यात विशाल शंकर कांबळे यासह अन्य प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामुळे काही प्रवाशांनी खैरवाडी येथे चेन ओढून रेल्वे थांबवली. त्यानंतर संतप्त प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना धारेवर धरले. चोरट्यांना पकडण्याच्या मागणीसाठी रेल्वे रोको आंदोलन केले. यामुळे या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. त्यामुळे पंचवटी एक्सप्रेस, हावडा एक्सप्रेससह अनेक गाड्या विलंबाने धावत आहेत.
मुंबईमध्ये आज गुरुवारी होणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून अनेक प्रवासी राज्यराणी एक्सप्रेसने मुंबईकडे जात आहेत. त्याचवेळी महापरिनिर्वाण दिनासाठीही हजारो प्रवासी मुंबईकडे निघाले आहेत.  या प्रवाशांनी अपुऱ्या रेल्वे सुरक्षेबाबत संताप व्यक्त केला आहे. दोन ते अडीच तासानंतर राज्यराणी खैरवाडीहून मुंबईकडे रवाना झाली. सकाळी १० वाजता मुंबईत पोहोचण्याची वेळ असलेली राज्यराणी एक्स्प्रेस गुरुवारी दुपारी १:४० वा. मुंबईत पोहोचली.

दरम्यान, या घटनेबाबत दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आता सदर घटना ही चोरीचा प्रकार नसून जागेच्या वादातून प्रवाशांमधील भांडण असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या गंभीर प्रकारावर दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून पांघरून घालण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूणच गुरुवारी घडलेल्या या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेस तसेच नांदेडहून पनवेलला जाणाऱ्या पनवेल एक्सप्रेसमध्येही अनेकदा प्रवाशांना लुटण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत रेल्वे विभागाकडून होणाऱ्या निष्काळजीपणाबाबत मात्र आता संताप व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!