
नांदेड – सण, उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना सहकार्याचे आवाहन जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात येत असले तरी खुद्द पोलिसांचीच भूमिका आता वादात सापडली आहे. मंगळवारी श्री विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी भक्तांना दिलेल्या लाठ्यांचा प्रसादावर मूग गिळून बसलेल्या, हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांना आता फैलावर घेतले जात आहे. लाठीमार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे. दुसरीकडे गुरुवारी निघणाऱ्या ईद ए मिलादच्या जुलूसमध्ये आक्षेपार्ह हरकती करणाऱ्यांना जुलूसमधूनच ‘उठा लेंगे’चा इशारा देण्यात आला आहे.
नांदेड शहरासह जिल्हाभरात गुरुवारी ईद-ए-मिलादचे २० जुलूस निघतील अशी माहिती पोलिसांनीच दिली आहे. या जुलूसमध्ये नियमांचे पालन व्हावे, कोणतीही आक्षेपार्ह नारेबाजी करू नये, आक्षेपार्ह गाणे लावू नये, इतरांना त्रास होईल असे वर्तन करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे केले आहे. आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्यांना जुलूसमधूनच उचलले जाईल असा स्पष्ट संदेश देताना गुरुवारी आणि पुढील तीन चार दिवसात निघणारे जुलूस शांततामय वातावरणात, आनंदात निघतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात मंगळवारी जवळपास २५ हजार सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्री मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यात घरगुती गणपतींची संख्या वेगळीच. सकाळी ११ वाजेपासून लहान मोठ्या गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात झाली. अनेकांनी नेहमीप्रमाणे गोदावरी नदीवर विसर्जनासाठी प्रयाण केले. तर जागोजागी महापालिकेने बॅरिकेटिंग केलेले निदर्शनास आले. त्यामुळे या बॅरिकेटिंग विरोधातही सोशल मीडियावर विरोध दर्शविण्यात येत आला. त्याचवेळी काही ठिकाणी राजकीय नेत्यांनी हे बॅरिकेटिंग काढून टाकल्याच्या पोस्टही टाकण्यात आल्या. त्यामुळे श्री विसर्जनाचा वाद दुपारपासूनच समाज माध्यमावर सुरू झाला होता. दुपारनंतर विसर्जनासाठी शहरातील मोठे गणपती बाहेर काढण्यात आले. मोठ्या उत्साहात श्री विसर्जन मिरवणुका सुरू होत्या वेगवेगळे देखावेही या मिरवणुकादरम्यान करण्यात आले होते. ठीकठिकाणी महाप्रसादही वाटप केला जात होता. रात्री साडेनऊनंतर मात्र पोलीस दल ‘ॲक्शन’ मध्ये आले. पोलिसांनी मिरवणुका लवकर संपविण्याच्या अनुषंगाने मंडळांना सूचना करण्यास प्रारंभ केला. यातून काही ठिकाणी गणेश भक्त आणि पोलीस आमने सामनेही आले. अनेकदा समजावूनही मंडळाचे पदाधिकारी ऐकण्यास तयार नसल्यामुळे पोलिसांनी काही ठिकाणी लाठीमार केला. यात खुद्द पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार हेही लाठीमार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचवेळी महावीर चौकात नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांच्या समक्षही लाठीमाराचा हा प्रकार घडला. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करून मिरवणुका गुंडाळल्या हेच चित्र पुढे आले आहे.
अनेक प्रशासकीय तसेच पोलीस अधिकारी समाविष्ट असलेल्या व्हॉट्स ग्रुपवर श्री विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात प्रशासकीय यंत्रणेविरुद्ध भडकावू आणि चिथावणी देणारे मेसेज सुरू होते. हे मेसेज अधिकारीही पाहत होते. काही अधिकारी अगदीच विनवणीच्या स्वरूपात उत्तरेही देत होते. एकीकडे समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट करू नयेत अशा सूचना पोलिसाकडूनच दिल्या गेल्या होत्या. त्यावर कारवाईचा इशाराही दिला होता मात्र प्रत्यक्षात तीन ते चार दिवस बघ्याचीच भूमिका घेण्यात आली.