क्राईम

अबब… नांदेड जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता काळात ९ कोटी ७४ लाखांचा मुद्देमाल जप्त..!

४ हजार ८०८ गुन्हेही दाखल, निवडणुक अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नांदेड पोलिसांची दमदार कामगिरी

नांदेड – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आणि लोकसभा पोटनिवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत नांदेड जिल्ह्यात १५ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत  पोलिसांनी तब्बल ९ कोटी ७४ लाख ७ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर ४ हजार ८०८ गुन्हेही दाखल केले आहेत.

लोकसभा पोटनिवडणूक  व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यस्था अबाधीत राखण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अवैध व्यवसायावर कारवाई करणे, अजामिनपात्र वॉरंट बजावणी करणे व प्रतिबंध कारवाई तसेच इतर कारवाई करणे बाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेश दिले होते.  जिल्ह्यातील गुन्हेगारांवर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने सर्व पोलीस ठाण्यांकडून गुन्हेगारांना हद्दपारी व स्थानबध्दतेसारखी परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या गुन्हेगारावर देखील परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. जामिनपात्र वॉरंट तसेच अजामिनपात्र वॉरंटमधील आरोपीतांना वॉरंट बजावणी करुन कायदेशिर कारवाई करण्यात आलेली आहे. भयमुक्त वातावरणामध्ये आगामी निवडणुक पार पाडण्याकरीता शस्त्र परवाना धारकांकडे असलेले १ हजार १० अग्नीशस्त्र जमा करण्यात आले आहेत. तसेच गोपनिय माहिती काढून अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, सुरज गुरव यांचे मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्यासह सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांनी केली आहे.

महिनाभरात २ कोटी ८६ लाख रुपयांची दारू जप्त..! जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. महिनाभरात ४८५ गुन्हे दाखल केले आहेत. २ कोटी ८६ लाख ६७ हजार ३९१ रुपयांची २ लाख १९ हजार ३२४ लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. अवैध गुटखा विक्री प्रकरणी १९ गुन्हे दाखल केले असून १६ लाख ९२ हजार ५७९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या महिन्याभरात ४ पिस्टल, ४ जिवंत काडतूस, ८२ तलवारी, ११ खंजीर आणि १५ भाले जप्त केले आहेत. निवडणूक काळात १५ लाख ४० हजार ६५० रुपयांची रोकडही जप्त केली आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यातील ६९ वाहन आणि एक मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीप्रकरणी १३ गुन्हे दाखल करण्यात आले असून १ कोटी ६० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एमपीडीएअंतर्गत तिघा जणांना स्थानबद्ध केले आहे. जिल्ह्यात २ हजार १६४ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. ४६० जामीन पात्र वॉरंट आणि ४३१ अजामीनपात्र वॉरंटही बजावण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!