
नांदेड – मला संपविण्यासाठी नांदेड आणि भोकरला टार्गेट करणारे आज स्वतःच संपले असून हे महाराष्ट्राचे नेतृत्व करणार काय? असा सवाल माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केला आहे. लातूरचे एक देशमुख पडले, नाना पटोले पडता पडता राहिले. हे नेते मला संपविण्यासाठी निघाले होते. आता त्यांचीच काय अवस्था झाली पहा अशी टीकाही चव्हाण यांनी केली.
नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघात ॲड. श्रीजया चव्हाण यांनी ५० हजाराहून अधिक मतांनी विजय मिळवला. या विजयानंतर त्यांनी मतदारसंघात रविवारी आभार सभा घेतल्या. या आभार सभेत बोलताना माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी विरोधकांचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला. मला संपवण्यासाठी राज्यातील नेते नांदेडला विशेषत : भोकरला टार्गेट करत होते मात्र आज त्यांचीच दयनीय अवस्था झाली आहे. लातूरच्या दोन देशमुखापैकी एक देशमुख पडला आहे. नाना पटोले पडता पडता दीडशे मतांनी विजयी झाले. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. जे जे माझ्या विरोधात येऊन माझ्या मतदारसंघात बोंबलत होते ते आज पडले आहेत. हे पडणारे नेते महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहेत काय सवालही त्यांनी केला आहे.
दरम्यान, रविवारी मुंबईतील सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन खा. चव्हाण यांनी महायुतीच्या महाविजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोकर विधानसभा मतदारसंघातील विजयाबद्दल ॲड. श्रीजया चव्हाण यांचा सत्कार करून अभिनंदन केले.यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अमरनाथ राजूरकर, नवनिर्वाचित आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.