
नांदेड – नांदेड दक्षिणमध्ये वंचित बहुजन आघाडीचा जनाधार वाढत असून आम्ही आता २६ हजाराहून ३४ हजारापर्यंत पोहोचलो आहोत. वंचित बहुजन आघाडी नेहमीच सकारात्मक राजकारण करणार असून जनतेला एक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू राहतील. विधानसभेतील या लढाईनंतर आता आमची लढाई आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राहणार आहे. आम्ही त्या निवडणुकांच्या तयारीला लागलो असून विधानसभा निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी आम्हाला समर्थन दिले, आमच्या प्रचारार्थ पुढे आले, मतदान केले त्या सर्वांचे आभार व्यक्त करत असल्याचे नांदेड दक्षिण विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फारूख अहमद यांनी सांगितले. विधानसभेतील राज्यभरातील निकाल सर्वसामान्य माणसांना अवाक करणारे आहेत. त्यामुळे काहीतरी गडबड आहे असे सांगताना अनेक मतदारसंघात आठ ते दहा टक्के मतदान एका रात्रीतून वाढले, हे कसे झाले असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे.
काँग्रेसच्या आरोपाला उत्तर देताना प्रत्येक पक्षाला निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार असल्याचे फारुख यांनी सांगितले. त्यामुळे आमची उमेदवारी संपूर्ण राज्यभरात होती. काँग्रेसमुळेच आमचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. काँग्रेसने सातत्याने दुटप्पी भूमिका घेतली आहे. नांदेड उत्तरमध्ये मौलाना सज्जाद नोमानी यांनी काँग्रेसला दिलेले समर्थन चालते. मात्र त्यांनीच दिलेले समर्थन दक्षिणमध्ये मात्र योग्य नसल्याचे काँग्रेसच्या काही मंडळींनी पुढे येऊन सांगितले आहे. त काही पक्षांना उत्तरमध्ये उमेदवार देऊ दिला नाही आणि दक्षिणमध्ये कायम ठेवला. या सर्व भूमिका काँग्रेसचे संशयी धोरण स्पष्ट करणारे आहे. त्यामुळे काँग्रेसने आमच्यावर आरोप करणार आहे चुकीचे असल्याचे सांगितले. यावेळी विठ्ठल गायकवाड, गोविंद दळवी आदींची उपस्थिती होती.