राजकीय

एका रात्रीत सहा ते दहा टक्के मतदान वाढते कसे? 

वंचित बहुजन आघाडीचे नांदेड दक्षिण मतदार संघाचे उमेदवार फारूख अहमद यांचा सवाल? काँग्रेसची दुटप्पी भूमिका, मौलाना सज्जाद नोमानीचे उत्तरमध्ये समर्थन चालते दक्षिणमध्ये मात्र वेगळी भूमिका

नांदेड – नांदेड दक्षिणमध्ये वंचित बहुजन आघाडीचा जनाधार वाढत असून आम्ही आता २६ हजाराहून ३४ हजारापर्यंत पोहोचलो आहोत. वंचित बहुजन आघाडी नेहमीच सकारात्मक राजकारण करणार असून जनतेला एक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू राहतील. विधानसभेतील या लढाईनंतर आता आमची लढाई आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राहणार आहे. आम्ही त्या निवडणुकांच्या तयारीला लागलो असून विधानसभा निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी आम्हाला समर्थन दिले, आमच्या प्रचारार्थ पुढे आले, मतदान केले त्या सर्वांचे आभार व्यक्त करत असल्याचे नांदेड दक्षिण विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फारूख अहमद यांनी सांगितले. विधानसभेतील राज्यभरातील निकाल सर्वसामान्य माणसांना अवाक करणारे आहेत. त्यामुळे काहीतरी गडबड आहे असे सांगताना अनेक मतदारसंघात आठ ते दहा टक्के मतदान एका रात्रीतून वाढले, हे कसे झाले असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे.

फारुख अहमद म्हणाले, नांदेड दक्षिण मतदार संघात निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर ५८ टक्के मतदान झाल्याचे रात्री सांगितले जाते. मात्र सकाळी उठून पाहताच हे मतदान जवळपास ६४ टक्क्यावर पोहोचते. त्यामुळे एका रात्रीतून सात ते दहा टक्के मतदान कसे वाढते असा प्रश्न उपस्थित केला. मतदानासाठी दिवसभर ईव्हीएम मशीन वापरल्यानंतर निकालाच्या तिसऱ्या दिवशी मतमोजणीसाठी बाहेर आणल्या असताना मशीनची बॅटरी ९९ टक्के राहते हा काय प्रकार आहे. आम्हाला याची माहिती द्यावी. कोणते तंत्रज्ञान यासाठी वापरले जाते याची माहिती जनतेलाही व्हावी, या प्रकाराबाबत आम्ही निवडणूक विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.
हा सर्व प्रकार संशयास्पद असून एकूणच नागरिकांनी याविरोधात आता उभे राहण्याची गरज आहे. आम्ही राजकीय पक्ष म्हणूनही त्याचा निश्चितपणे विरोध करू मात्र जनतेची साथ त्याला आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीत आमचा जनाधार निश्चितपणे वाढला आहे. २६ हजारांहून आम्ही ३४ हजारांवर पोहोचलो आहोत. विजयाच्या आम्ही समीप पोहोचलो नसलो तरी जनतेचे समर्थन आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत. ज्यांनी मतदान केले त्यांचे तर आम्ही प्रश्न सोडवूच पण ज्यांनी मतदान केले नाही, ज्यांनी विरोध केला त्यांचेही पश्न सोडवण्यासाठी काम करणार आहोत. विधानसभेत सर्वात प्रारंभी आपली उमेदवारी जाहीर झाली होती. त्यामुळे आपण प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलो होतो मात्र शेवटच्या तीन दिवसात पैशांचा अमाप वापर करून आमची मते फोडण्यात आली. त्यामुळे आमचे मोठे नुकसान झाले. या धनशक्तीविरुद्ध उभे राहण्याची ताकद आता आम्ही आगामी काळात निर्माण करणार आहोत असे फारुख अहमद यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या आरोपाला उत्तर देताना प्रत्येक पक्षाला निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार असल्याचे फारुख यांनी सांगितले. त्यामुळे आमची उमेदवारी संपूर्ण राज्यभरात होती. काँग्रेसमुळेच आमचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. काँग्रेसने सातत्याने दुटप्पी भूमिका घेतली आहे. नांदेड उत्तरमध्ये मौलाना सज्जाद नोमानी यांनी काँग्रेसला दिलेले समर्थन चालते. मात्र त्यांनीच दिलेले समर्थन दक्षिणमध्ये मात्र योग्य नसल्याचे काँग्रेसच्या काही मंडळींनी पुढे येऊन सांगितले आहे. त काही पक्षांना उत्तरमध्ये उमेदवार देऊ दिला नाही आणि दक्षिणमध्ये कायम ठेवला. या सर्व भूमिका काँग्रेसचे  संशयी धोरण स्पष्ट करणारे आहे. त्यामुळे काँग्रेसने आमच्यावर आरोप करणार आहे चुकीचे असल्याचे सांगितले. यावेळी विठ्ठल गायकवाड, गोविंद दळवी आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!