क्राईम

निवडणुका संपताच नांदेड जिल्हा पोलीस दल ॲक्टिव्ह मोडवर..!

शहर वाहतूक व्यवस्था, अवैध वाळू उपसा यासह गुन्हेगारांच्याही आवळल्या मुसक्या 

नांदेड – जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुका आणि त्यासोबतच लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक शांततेत पार पाडल्यानंतर आता नांदेड जिल्हा पोलीस दलाने आपला मोर्चा गुन्हेगारांकडे वळवला आहे. नांदेड शहरातील कोलमडलेली वाहतूक व्यवस्था, अवैध धंदे तसेच अवैध वाळू उपसा आता पोलिसांच्या रडारवर आला असल्याचे गेल्या दोन दिवसातील पोलीस विभागाच्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता निवडणुका संपताच नांदेड जिल्हा पोलीस दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा ॲक्टिव्ह मोडवर येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नांदेड पोलीस परिक्षेत्राचा पदभार उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी स्वीकारला आणि त्यापाठोपाठच नांदेड जिल्हा पोलीस दलाची धुरा जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या हाती आली. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारांची झोप उडाल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र दरम्यान निवडणुकीच्या काळात जिल्ह्यातील अवैध धंदे हळूहळू तोंड वर काढत असल्याचे चित्र निर्माण होत होते. हे पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी निवडणुकीनंतर पुन्हा एकदा आपल्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना सूचना देत कोणत्याही परिस्थितीत अवैध धंदे जिल्ह्यात सुरू राहणार नाहीत, याची खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी ज्या ठाणे हद्दीत अवैध धंदे सुरू असतील तेथे कारवाई झाल्यास तेथील ठाणे प्रमुखालाच जबाबदार धरले जाईल, असे यापूर्वीच निर्देश दिले आहेत. त्यानुसार उमरी येथील ठाणेदाराला उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी थेट नियंत्रण कक्षात बसविले आहे. या कारवाईनंतर पोलीस दलातील अधिकारी दक्ष झाले असून या दोन्ही अधिकाऱ्यांच्या रोखठोक भूमिकेमुळे आता या सर्व ठाणे प्रमुखांना कामाला लागावे लागले आहे.
गोदावरी नदीतून होत असलेला अवैध वाळू उपसा रोखण्याची प्रमुख जबाबदारी महसूल विभागाची असली तरीही ही जबाबदारी आता पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड पोलीस परिक्षेत्राचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलिस दलाने आपल्या खांद्यावर घेतली असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणुकीनंतर पोलीस विभागाने जुन्या नांदेडातील मरघाट येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्याविरुद्ध ४ डिसेंबर रोजी सायंकाळी कारवाई केली. या कारवाईत शेख जावेद शेख आणि फसल चाऊस बाबू चाऊस या दोघाविरुद्ध गुन्हे दाखल केले.  नांदेड ग्रामीण आणि इतवारा पोलीस ठाण्याच्या वतीने संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली आहे.  या कारवाईत पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर आणि पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या प्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्या तक्रारीवरून इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरीकडे पोलिसांनी ५ डिसेंबरच्या पहाटे ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन पार पाडले. या ऑपरेशनमध्ये ७२ अधिकारी आणि २५९ कर्मचारी सहभागी झाले होते. या कारवाईदरम्यान चौघाविरुद्ध ४ गुन्हे दाखल करण्यात आले. एकूण २२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एका फरारी आरोपीस अटक केली आहे तर वॉरंट तामिलचीही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान स्थानिक  गुन्हे शाखेच्या पथकाने तीन गुन्ह्यातील २ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भोकर, उमरी तसेच शिवाजीनगर ठाणे हद्दीतील गुन्ह्यातील हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पाहिजे असलेला एक आरोपी अटक झाला असून तीन जबरी चोरीचे आरोपी अटक करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून आणखी दोन गुन्हे असे एकूण तीन गुन्हेही उघडकीस आणले आहेत.  हे कोंबिंग ऑपरेशन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. पोलीस दलाने सुरू केलेली ही मोहीम यापुढेही अविरत सुरू राहील अशीच अपेक्षा केली जात आहे.

नांदेड शहरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्थेलाही वळणावर आणण्यासाठी आता पोलीस दल सरसावले असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहर वाहतूक शाखा वजीराबाद आणि नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाकडून ४ आणि ५ डिसेंबर रोजी वजीराबाद चौक ते आयटीआयपर्यंत विशेष मोहीम राबवत अतिक्रमण हटविण्यात आले. या मोहिमेत शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत जमादार, उपनिरीक्षक कोटतीर्थवाले, केळकर यांच्यासह  अंमलदार, दंगा नियंत्रण पथक तसेच मनपाचे अतिक्रमण पथक सोबत घेऊन ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या २०८ वाहन चालकाविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून ३ लाख ७१ हजार ७५० रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्याच वेळी ८५ वाहनचालकांनी न भरलेला ६९ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!