क्राईम

मुखेड पोलिसांनी पकडला ९ ब्रास वाळूचा ट्रक

वाळूसह २० लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, चालक, मालक या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

नांदेड – देगलूर रस्त्याने एका हायवा ट्रकमधून विनापरवाना लाल रेतीची चोरटी वाहतूक सुरू असताना २३ डिसेंबर रोजी मुखेड पोलिसांनी ती हायवा ट्रक पकडून कारवाई केली. जाहूर चौकात ही हायवा पकडली. या कारवाईत ९ ब्रास रेतीसह पोलिसांनी २० लाखांचा हायवा ट्रकही जप्त केला आहे. चालक आणि मालक या दोघाविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.

मुखेड ठाणे हद्दीत अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाची माहिती मिळाल्यानंतर मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, पो. कॉ. प्रदीप शिंदे हे २३ डिसेंबर रोजी जाहूर चौकात पोहोचले. त्यावेळी सकाळी सव्वा आठ वाजे दरम्यान देगलूर रस्त्यावरून एक हाय ट्रक विनापरवाना लाल रेतीची चोरटी वाहतूक करीत असल्याचे आढळले. दोन पंचांना बोलून या छाप्याबाबत माहिती दिली. सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी लाल रेती भरून येत असलेला हायवा ट्रक थांबवला. त्या हायवा चालकाकडे रेती वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले. यातील हायवा चालक आकाश सोपान वाघमारे रा. राजुरा ता. मुखेड आणि मालक मारुती पुंडलिक जंगमवाड रा. राजुरा, ता. मुखेड या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

दरम्यान, नांदेड पोलिसांनी अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात मोहीम उघडली असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचवेळी शहरालगत असलेल्या आणि नांदेड शहराची तहान भागवणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पातूनच भर दिवसा विद्युत पंपांच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. भरदिवसा सुरू असलेला हा  अवैध वाळू उपसा नेमका कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हे मात्र अद्यापही अस्पष्टच आहे. धरण परिसरातून वाळू उपसा करण्यास मनाई असतानाही नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पातून मात्र मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. नांदेड पोलीस परिक्षेत्राचा पदभार स्वीकारल्यानंतर उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अवैध उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर वचक निर्माण केला होता.  मात्र पुढे निवडणुका आणि परिक्षेत्रांतर्गत घडलेल्या काही घटनांमुळे उमापांचे नांदेड जिल्ह्यातील लक्ष कमी होताच वाळूमाफिया पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचेच स्पष्ट होत आहे. त्यामुळे या वाळू माफियांवर आळा बसणार की नाही याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यात राजकीय हस्तक्षेपाचा प्रकारही पुढे येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!